नावीन्याचे कौतुक क्षणांपुरते असले की जिव्हारी लागते’, हे असे विधान डोक्यात घोळत राहण्यास कारणे व निरीक्षण दोन्हीही बलवान होते. प्रसंग, नातं कोणत्याही बाजूंनी विचार करता आजकालच्या वातावरणात असे लक्षात येते की नवेपणा लगेचच संपुष्टात येतो आहे. यातून एक वैचारिक मोती प्रकट झाला. वाढत्या संपर्क साधनामुळे कोण कुठे आहे, किती अंतरावर आहे या सगळ्या गोष्टी क्षणांत दुसऱ्या लोकांना समजतात. धावपळीच्या जीवनात गडबड, गोंधळ होताच संपर्काचे महत्त्व अर्थातच लक्षात येते.
एकीकडे अत्यंत वृद्धावस्थेकडे झुकलेले दांपत्य त्यांना एकमेकांविषयी असणारी काळजी, हे सगळं अनुभवत असताना त्यांच्या नात्यातील गोडवा आजही इतक्या वर्षांनंतर पन्नास-पंच्चावन्न वर्षांच्या सहजीवनानंतर टिकून आहे. दिवसागणिक त्यातले नावीन्य वृद्धिंगत होत आहे असेच लक्षात आले. नातवंडे, परतवंड, पाहणारी अशी ही मागची पिढी आपल्या हुशारीने समोरच्याला दिपवून टाकतात. येणाऱ्या, जाणाऱ्यांना पुनश्च भेट घडावी इतकी आत्मीयता मनोमन पेरत रहातात. हा नावीन्याचा आविष्कार दरवेळी वेगळाच भासतो, जो आमच्या पिढीलाही थक्क करून जातो.
विवाह जुळवताना केलेली पायपीट, घेतलेले कष्ट या दोघांनाही आठवण होताच सुरकुतलेले चेहरे, पत्र लेखनातील प्रेमाने अद्यापही तजेलदार होतात. बाहेर काही कारणास्तव गेलेला जोडीदार जर दिवसभर समजा दिसलाच नाही, तर थकलेले डोळे वाटेकडे लागलेले असतात. इथे प्रश्न नक्कीच उभा राहतो, करता येईल का आजच्या पिढीला असे प्रेम? शक्यता कमीच आहे असे उत्तरही मिळते. इतक्या वर्षांनंतरही माझ्या माहेरच्या माणसांनी हे केले, ते केले, असे आजीबाईंना सर्वकाही ठामपणे आठवत राहते. गडगडत्या हास्याने आजोबाही त्यांच्या म्हणण्यात सामील होतात. या नात्यांतील नावीन्यतेला साक्षात परमेश्वरी शुभेच्छा आहेत म्हणूनच हे सुकर आशीर्वादासाठी आजही डोईवर आहेत, असे त्यांच्या समोर नतमस्तक होताना वाटते.
दुसरे निरीक्षण असेही झाले की काही कार्यालयीन सहकाऱ्यांची नुकतीच नवीन नाती जुळली आहेत. थोड्याच दिवसांत विवाहवेदीवर त्यांचे आगमन होईल. संपर्क तर अविरत चालू आहे. आपली मते जोडीदाराला ठामपणे सांगण्याचे धैर्यही आहे. तडजोडीला सुरुवातीलाच पूर्णपणे नकार, गप्पांच्या ओघात त्याचे त्याने ठरवावे माझे मी बघेन. अशी वृती दिसून आली. उच्च वसाहतीमधील घर, वाहन, पैसा म्हणजे सुखाची पर्वणी हे जरी खरे असले तरी तिथे सहवासाची, मनाची किंमत काय? हा प्रश्नच अनुत्तरित राहतो. वर्षानुवर्षे हेच नाते, त्यातील नावीन्यता पदोपदी कष्टांतूनच उभी करावी लागणार यात शंकाच नाही. नाते टिकवताना केलेली धडपड कधीच वाया जाणार नाही हेही तेवढेच सत्य आहे. दोन वेगवेगळ्या गृहव्यवस्थेतील संस्कारातील माणसे एकत्र येऊन वेगळे घरकुल निर्माण करतात. या सगळ्याला जमावाची साथ अपेक्षित असते, पण तीही सदोदित मिळत राहील याची खात्री नसते. अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास टिकवून ठेवणे एवढेच काय ते आपल्या हातात असते.
समाज कितपत दखल देऊ शकतो हेही लक्षात घेतले पाहिजे, फार फार तर उंबऱ्यापर्यंत त्या व्यतिरिक्तची लढाई प्रत्येकाचीच वेगळी, स्वभावातील विविधता जपत कुटुंबातील एकसंधता ही फार मोठी तारेवरची कसरत विरोध, सहमती याचे दर्शनही क्षणाक्षणाला घडत असते. पण एक समान धागा असा लक्षात येतो की दिवसभर कार्य-कर्तव्य चढाओढ, स्पर्धा यातून तिन्ही सांजेला वाटणारी घरकुलाची ओढ. ज्यांच्याकडे कुटुंब आहे ते खरंच नशीबवान असे एकटे राहणाऱ्या माणसास वाटते.
अजून एक बाजू नावीन्याची नेहमीच दिसते. पालकांच्या घरकुलाकडे ओढीने येणारी त्यांची पिल्ले, मग तो नोकरीनिमिताने गाव सोडून शहरात रहाणारा मुलगा असो किंवा परगावाहून-सासरहून येणारी लेक बसस्थानकावर घ्यायला येणाऱ्या आईवडिलांचे चेहरे वेगळीच ऊर्जा देतात. आपण त्यांना त्रास होईल म्हणून नका येऊ, घरीच तर यायचे आहे असे सांगतो पण यातूनही प्रेम वाढतच रहाते. त्यांच्या अस्तित्वाने हसते, खेळते असणारे घरकुल कालौघात तसेच रहात नाही. रिकामी वास्तू कातरवेळे सारखी भासते. म्हणूनच आहे तोपर्यंत हे नवचैतन्य क्षणोक्षणी अनुभवता आले पाहिजे, पिढ्यान्पिढ्या मधील मतांतरातही नव्हाळीचा साज अखंडपणे चढला पाहिजे.
– मेघनुश्री