आपल्या आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही अविस्मरणीयच असते. पण पहिल्या पावसाची गोष्टच न्यारी. दरवर्षी तप्त वैशाखवणव्यात भाजून निघाल्यावर चराचराला ओढ लागते ती पावसाची. लग्नकार्याच्या यथेच्छ मेजवान्या झोडून झालेल्या असतात. विद्यार्थ्यांनी सुट्टीत मामाच्या गावाचा आनंद लुटलेला असतो. आभाळात काळे ढग जमू लागतात. सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट होतो.
अचानक टपोरे थेंब तृषार्त धरतीचे ओठ भिजवतात. तो ओल्या मातीचा मृदगन्ध मनाला मोहरून टाकतो. मन भूतकाळातल्या बालपणीच्या रम्य आठवणीत हरवून जाते. लहानपणी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ म्हणत पावसाला केलेली विनवणी आठवते. आता मात्र “रेन रेन गो अवे’ शिकताना आणि शिकवताना ती मजा येत नाही. या पहिल्या पावसाची ओढ सर्वांनाच असते. बळीराजा आपलं शेत शिवार तयार करून आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. कधी एकदा पाऊस येईल आणि मी पेरणी करील याची तो चातकासारखी वाट पाहत असतो. विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आला नाही तर “धोंडी धोंडी पाणी दे दाळ दाणा पिकू दे’ असं म्हणत पावसाला साकडं घातलं जातं. या पहिल्या पावसात लहानग्यांना भिजायचं असतं. चिखलात नाचायचं व खेळायचं असतं.
शाळा सुरू झालेली असते. नवीन वह्या, पुस्तके, छत्री, रेनकोट, दप्तर यांच्या खरेदीची लगबग सुरू असते. ओल्या मातीच्या वासासोबतच आणखी एक वास मनात चैतन्य पसरवत असतो, तो म्हणजे कोऱ्या वह्या-पुस्तकांचा. लेखक आणि कवी यांना पावसावर लिहावसं वाटतं ते पावसाच्या पहिल्या सरींसोबतच.
शांता शेळके म्हणतात,
“साद पावसाची आली, शहारली माती,
भुईसवे आभाळाची
जुळे आज प्रीती’
पेरणीचे वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात,
धरत्रीच्या कुशीमधी
बिय बियाणं निजली
वरे पसरली माटी
जशी शाल पांघरली
बिय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वरे
गह्यरल शेत जसं
अंगावरती शहारे
उन्हाने रापून काळ्या पडलेल्या अंगावर धरती माय पहिल्या पावसाने जणू हिरवा शालू पांघरते. जिकडेतिकडे चैतन्याचा मोहोर फुलून येतो. सारी सजीव सृष्टी आनंदून जाते. पेरणी लागल्याच्या आनंदात शेतकरीही सुखावतो. व्यापारी, मजूर आणि चाकरमानीही मनोमन सुखावतात. कारण ज्या कृषी व्यवस्थेवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती कृषिव्यवस्था या पावसावरच अवलंबून आहे, हे सारेच जाणतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप प्रगती केली, मात्र अजूनपर्यंत त्याला निसर्गावर मात करता आली नाही.
कृत्रिम पाऊस पाडण्याचेही प्रयत्न झाले मात्र ते यशस्वी ठरू शकले नाहीत. पाऊस डाउनलोड करता येईल असं एखादं तंत्रज्ञान अजून आपण विकसित करू शकलो नाही. म्हणून आपल्या मर्यादा जाणून पर्यावरणात हस्तक्षेप न करता झाडे लावून आपण निसर्गाला जपलं पाहिजे.
कॉलेजात जाणाऱ्या तरुणाईलाही हा पाऊस भुरळ घालतो. कॉलेजचे ते मोरपंखी दिवस आणि पहिला पाऊस… प्रेमासाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होते. आणि सोबतीला असतो गारवा…
गारवा वाऱ्यावर भिर भिर पारवा नवा नवा
प्रिये नभी हा चांदवा नवा नवा
आणि मग त्याच्या प्रेमाला प्रेयसी ही तितक्याच अधीरतेने साद घालते… आणि आपल्या भावना व्यक्त करते,
“अधीर मन झाले, मधुर घन आले,
धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सुरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधीर मन झाले’
जीवनात औदासिन्य आलेल्या माणसालाही पहिला पाऊस पल्लवित करतो.
कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे,
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने
अशी त्याची अवस्था होते आणि क्षणभर का होईना तो आपल्या दुःखातून बाहेर येतो. बाहेर कोसळणारा पाऊस आणि खिडकीत बसून तो पाऊस पाहताना होणारा आनंद, पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद हा अवर्णनीयच.
बाहेर पाऊस सुरू असताना हातात पुस्तक आणि वाफाळलेला चहा म्हणजे जणू स्वर्गसुखच.
जीवनाच्या धावपळीत घामाघूम होऊन जेव्हा आपण थकून जातो तेव्हा पहिला पाऊस आपल्याला हळवं करतो. एक जादुई मोरपीस मनावरून फिरवल्यागत पुन्हा एकदा आपण त्या निरागस बालपणात हरवतो. बाहेर पाऊस कोसळत असतो आणि मन जगजीतजींच्या ओळी गुणगुणत असतं…
ये दौलत भी ले लो
ये शोहरत भी ले लो
भले छिन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी…
– प्रशांत रामभाऊ सुसर