“संतुलन’ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपल्या आयुष्यात जर संतुलन बिघडले तर आपल्याला विपरीत परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच आपल्या आयुष्यात संतुलन कसे राखावे नेमके याच विषयी थोडेसे…
आपण लहान असताना रांगत होतो. हळूहळू आपण दोन पायावर उभे राहून तोल सांभाळायला लागतो. नंतर आपण एका पायावरसुद्धा तोल सांभाळू शकतो. काहीजण हातावरही चालू शकतात. हा तोल सांभाळणे आपल्याला जमत असते. हेच जर आपला तोल बिघडला तर आपण पडतो हेही आपल्याला माहिती आहे.
आपल्याला जीवनातसुद्धा असाच तोल, संतुलन राखायचे असते. आपण सर्वच जण चुका करत असतो. काही वेळा असे होते की आपण चुक करीत आहोत असे आपल्या लक्षात येतही नाही. पण बऱ्याच वेळा काही चुका अशा असतात की आपण टाळू शकतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्या आयुष्यात प्रश्न निर्माण करून ठेवतो आणि ते प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात आयुष्यातला बराच वेळ निघून जातो. “कर्ज, अग्नी व रोग यांना वेळी पायबंद घाला.’ असे नेहमी सांगितले जाते. हे तिनही मुद्दे असे आहेत की कमी असतानाच आटोक्यात आणणे सहज शक्य असते, एकदा का वाढले की क्षणाक्षणाला आपण आणखीन खोल गर्तेत बुडत जातो.
कर्ज घेत असताना ते डोईजड होणार तर नाही ना? याची काळजी आधी घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा व्यवसायासाठी कर्ज घेतले जाते. मात्र काही व्यावसायिक आडाखे चुकतात अशा वेळी ते कर्ज वाढत जाते. याचसाठी कर्ज घेतानाच ज्या व्यवसायासाठी कर्ज उचललेले आहे त्यातून जर फेडणे शक्य झाले नाही तर दुसरी पर्यायी व्यवस्था काय असेल याचाही विचार करून ठेवावा. याशिवाय आपण भविष्यात व्यवसाय वाढीसाठी कर्ज काढावे लागेल या हेतूने जास्तीत जास्त रक्कम व्यवसायातून बाजूला कशी काढता येईल ते पाहावे. जेव्हा प्रत्यक्ष कर्ज काढण्याची वेळ येईल त्यावेळी अशी बाजूला काढलेली रक्कम जेवढी जास्त तेवढे कमी कर्ज आपल्याला काढावे लागेल. यामुळे व्यवसायात अपेक्षित ती आर्थिक गणिते जर जुळली नाहीत तर कर्ज कमी असल्याने ती रक्कम इतर काही माध्यमातून पैसे उभे करून फेडू शकतो. लवकरात लवकर कर्ज मुक्त झाले म्हणजे पुन्हा नव्याने आपण आर्थिक घडी बसवू शकतो.
आपण जर आर्थिकदृष्ट्या कमजोर पडलो तर अल्पावधीतच इतरही बाबतीत कमजोर पडत जातो. जसे आपला व्यवसाय जो सुरळीत चाललेला असतो त्याची घडी बिडते. आपण ज्यांच्याकडून माल आणत असतो ते पैसे दिल्याशिवाय नविन माल देत नाही आणि माल नाही म्हणून ग्राहक परत जाते. म्हणजेच मिळणारे पैसे कमी होतात. जे नोकरी करतात त्यांनी जर भरमसाठ खर्च वाढवून ठेवले, अनावश्यक त्या खर्चासाठी जसे पर्यटन वगैरे, कर्ज काढले किंवा व्यसनांवर जास्त पैसे खर्च केले, तर अशा काही चुकीच्या वागण्यामुळे आपण जास्तच आर्थिक गर्तेत सापडतो. आपले जर आर्थिक संतुलन बिघडले तर ते पुन्हा साधण्यासाठी फारच कष्ट घ्यावे लागतात. आपली आर्थिक घडी एकतर बिघडू द्यावयाची नाही आणि जर बिघडलीच तर लवकरात लवकर त्यातून बाहेर कसे पडता येईल याकडे लक्ष द्यावे.
आपण आपल्या शरीराची निगा राखलीच पाहिजे, काळजी घेतलीच पाहिजे. बरेचजण व्यसने करून शरीराची अपरिमित हानी करून घेतात. जेव्हा शरीरातील प्रतिकार करण्याची ताकद संपते अशा वेळी अनेक व्याधी विकार डोके वर काढतात. दुसऱ्या शब्दांत आपणच व्याधी विकारांना आमंत्रण देत असतो. एकेकाळी मधुमेह होण्याचे वय सरासरी साठ होते ते सध्या तीस झालेले आहे. तर वजन जास्त असलेल्या व्यक्ती सध्या जास्त आढळतात. वजन जास्त असले की रक्तदाब होऊ शकतो, वजन जास्त व रक्तदाब असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त.
आपले अमूल्य शरीर व्याधीग्रस्त का होते याच्या कारणांकडे जर लक्ष दिले तर “चुकीची जीवन शैली’ हेच पुढे येते. आपण जो आहार घेत आहोत तो आपल्या शरीराला योग्य आहे का याचा विचारच आपण करीत नाही. फक्त चवीला चांगले खाद्यपदार्थ असले म्हणजे झाले. एवढाच आपला निकष. एवढेच नाही तर रात्री विनाकारण जागायचे आणि दिवसा कमी झोपायचे यामुळेही पचन क्रियेवर विपरीत परिणाम होतो. आपल्या शरीराचे एक घड्याळ असते. ठराविक वेळी जेवणे, ठराविक वेळी काम करणे, ठराविक वेळी झोपणे असे जर वेळापत्रक ठेवले तर शरीराचे संतुलन बिघडत नाही. आपल्याला “उधार की जिंदगी’ जगायची नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वयाच्या तिशीत आपण “अमुक एक गोळी खाल्ल्याशिवाय जेवायचे नाही’ असे जर आपल्याला करावे लागले तर त्या गोळीवर आपले जीवन अवलंबून राहते. हेच ते परावलंबित्व. हीच ती “उधार की जिंदगी’. आपण अशी वेळच येऊ द्यावयाची नाही. यासाठी आपला आहार-विहार हा योग्य तोच असला पाहिजे. बरेच तरुण अनेक खेळाडूंना आपला आदर्श मानतात पण ते खेळाडू तंदुरुस्ती राखण्यासाठी किती मेहनत घेतात, किती संयम ठेवतात याकडे मात्र दुर्लक्ष करतात.
एकदा का तन व धनाचे संतुलन बिघडले की मनाचेही संतुलन बिघडायला वेळ लागत नाही. आपण जर एका बाजूला कमजोर पडत असू तर ती कमजोर बाजू लगेचच सावरायची आहे म्हणजे पुढचे सर्व अनर्थ टळतील. “संकटे एका बाजूने कधीच येत नसतात…’ असे नेहमीच सांगितले जाते. म्हणूनच जर एक बाजू वेळीच सावरली नाही तर त्याचा परिणाम दुसऱ्या बाजूवर होतो. असे वाढतच जाते. परिणामी आपल्याला एकाच वेळी अनेक आघाड्यावर लढावे लागते. असे अनेक आघाड्यांवर आपण समर्थपणे उभे राहू शकत नाही. “स्टीच इन टाईम सेव्हज नाईन’ अशी इंग्रजीत म्हणच आहे. त्याप्रमाणे आपण एखादा प्रश्न कमी तीव्रतेचा असतानाच लगेच सोडवून टाकायचा. म्हणजे पुढचे अनेक प्रश्न मिटतील. आणि आपण आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकू. आपण वेळीच सावध होऊन, भविष्यात प्रश्नच निर्माण होणार नाहीत याची काळजी आज घ्यावयाची आहे आणि आपला भविष्य काळ सुखकर करावयाचा आहे.
आपण आपल्या मनो देवतेच्या गाभाऱ्यात बसून मनोदवेतेला जर संयमाचे पुष्प समर्पित केले तर निश्चितच आपले संतुलन आयुष्यात कधीच बिघडणार नाही याची खात्री बाळगा.
– अनिकेत भालेराव