नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सुरू होताच सभागृहात गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच भाजपने राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी लंडनमध्ये देशाची बदनामी केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल यांना सभागृहात माफी मागावी अशी मागणी केली.
राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते पियुष गोयल यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. यानंतर कॉग्रेस देखील आक्रमक झाली. तपास यंत्रणांचा दाखल देत काँग्रेसने देखील भूमिका मांडायला सुरुवात केली. सभागृहंत जोरदार गोंधळ झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. या संदर्भात पक्षाने मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठकही घेतली. या बैठकीला सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर चौधरी आणि पक्षाचे खासदार उपस्थित होते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य समोर आले आहे. या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे टाकण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले. यासाठी खर्गे यांनी 16 विरोधी पक्षांची बैठकही घेतली होती.