सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीकाटिपणी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची माफी मागावी नाही तर होणाऱ्या परिणामास सामोरे जावे, असा इशारा सातारा विकास आघाडी आणि उदयनराजे भोसलेप्रेमींनी शुक्रवारी दिला. आंबेडकर यांच्या टिकाटिपणीवर साताऱ्यात गोल बागेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे बोलताना सातारा व कोल्हापूर राजघराण्याच्या वंशजासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक आणि उदयनराजे भोसले प्रेमींनी राजवाडा येथील गोल बागेसमोर शुक्रवारी दुपारी 12 वाजता एकत्र येत आंबेडकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. अठरापगड जातीचे मावळे सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे तेरावे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करणे आंबेडकर यांना न शोभणारे असेच वर्तन आहे. यापुढे उदयनराजे यांच्यावर टीका करणे बंद करावे अन्यथा प्रकाश आंबेडकर यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.’
उपनगराध्यक्ष किशोर शिंदे म्हणाले, “खा. उदयनराजे भोसले यांच्याबाबत आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आम्ही सातारकर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांची माफी मागावी.’ यापुढे त्यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद डी. जी. बनकर, सुहास राजेशिर्के, मनोज शेंडे, ज्ञानेश्वर फरांदे, स्नेहा नलवडे, वसंत लेवे, सुनीता पवार, विजय बडेकर, संजय शिंदे, दिलीप गवळी, संग्राम बर्गे यावेळी उपस्थित होते.