- परतीच्या पावसाचा फटका : दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना पेंढ्यासाठी करावी लागणार वणवण
- वाढीव दराच्या पेंढ्यामुळे दूध दरवाढीची शक्यता
कर्जत : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान केले त्यामुळे भाताचे पीक, तर सोडाच पण जनावरांसाठी पेंढा सुद्धा मिळणे आता दुरापास्त होणार आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गायी, म्हशींसाठी पेंढा मिळविण्यासाठी अन्य जिल्ह्यामध्ये वणवण भटकावे लागणार असून, पेंढ्याच्या कमतरतेमुळे वाढीव दराने पेंढा खरेदी करावा लागणार आहे. परिणामी वाढीव खर्चामुळे पुढील काळात दूध दरवाढ होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
पावसामुळे शेतात पाणी साचले, पीक कुजले त्यामुळे पेंढा नाही. चिंतेची बाब म्हणजे संपूर्ण राज्यातच भातशेतीचे नुकसान झाल्याने पेंढा आणायचा तरी कोठून हा यक्ष प्रश्न दुग्धव्यवसायांसमोर आ वासून उभा आहे. सध्या जनावरांसाठी हिरवा चारा, गवत आहे मात्र उन्हाळ्यात पेंढ्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तेव्हा पेंढ्यांची समस्या भीषण बनणार. यापूर्वी तळेगाव आदी ठिकाणावरून पेंढा, गवत आणले जायचे; मात्र आता तेथेही मिळणारे कठीण आहे.
पूर्वी तालुक्यात मोठी माळराने, गुरुचरण क्षेत्र संरक्षित असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटायचा. मात्र आता गुरुचरण जागेवर होणारे अतिक्रमण आणि वाढत्या फार्म हाऊस संस्कृती जंगले, माळरानावर आपत्ती ओढवली आहे. परिणामी गुरांना चाऱ्यासाठी आता कोठे मोकळे सोडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच पावसामुळे पेंढाही मिळणार नसल्याने पुढील काळात जनावरांचा सांभाळ करणे कठीण होणार आहे.
– सुनील रसाळ, शेतकरी.