मुंबई – परळी तालुक्यातील पांगरी गाव येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे 19 कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या कारखान्याच्या चेअरमन आहेत. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या निष्ठावंतांची भाजपमध्येच वंचना सुरु असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटं तुपात आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट (एक्स) द्वारे भाजपवर केली आहे.
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट –
पंकजा मुंडे यांच्यावरील या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहीले की, “जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे. इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले.”
पुढे त्यांनी लिहिले की, “विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही. नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.
जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) September 25, 2023
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया –
दरम्यान, या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली होती. “कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चाललाच नाही. आठ-नऊ कारखाने दिल्लीत केंद्र सरकारकडे गेले होते. त्यातही माझे नाव होते. पण मी सोडून इतर सर्व जणांना मदत मंजूर झाली. ती मदत झाली असती तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या. खरंच माझ्या कारखान्याची अडचण झाली नसती,” अशी नाराजी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती.