पुणे -पाषाण-बावधनकडून थेट सातारच्या दिशेने जाणारी वाहनांची कोंडी आता कायमची फुटणार आहे. कारण या वाहनांसाठी असलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाषण-बावधनकडून सातारला जाणाऱ्या वाहनांना पुलावरुन थेट महामार्गावर जाता येणार आहे.
चांदणी चौकातील मुख्य उड्डाणपुल वगळता अन्य मार्गांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. आतापर्यंत कोथरूड ते मुळशी, कोथरूड ते एनडीए, मुळशी ते कोथरूड आणि सातारा, मुळशी ते मुंबई आणि मुळशी, बावधन ते कोथरूड हे मार्ग सुरू झाले आहेत. त्यामध्ये आता बावधन ते सातारा रोड हा मार्गही खुला करण्यात आला आहे.
यापूर्वी पाषाण-बावधनकडून सातारला जाणाऱ्या वाहनांना विवा इन हॉटेलच्या चौकातून उजवीकडे वळून आणि महामार्गावर येऊन डावीकडे वळून सातारच्या दिशेने जावे लागायचे. मात्र, हा रस्ता चौकातून पुढे गेल्यावर अरूंद आणि अन्य मार्गावरून येणारी सर्व वाहने याचठिकाणी येत असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी असायची. त्यामुळे वारजे किंवा सातारच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा या कोंडीत बराचवेळा जात असे. मात्र, आता वाहने विवा इन चौकातून सरळ पुढे येऊन नवीन उड्डाणपुलावरून थेट महामार्गावर येऊ शकतात. त्यामुळे चौकातील कोंडीही कमी होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्यासह कर्मचारी, एनएचएआय आणि एनसीसीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.