नवी दिल्ली: चीनच्या सीमेलगतची सुरक्षा आणखी बळकट करण्याचे धोरण भारताने अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) नव्या 40 तुकड्या सीमाभागात धाडल्या जाणार आहेत. त्या तुकड्या चीनलगत असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) जवळ असणाऱ्या विविध भागांत तैनात केल्या जातील.
आयटीबीपीच्या तुकड्यांमध्ये पर्वतमय भागांत लढाईचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे 4 हजार जवानांचा समावेश असेल. लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या क्षेत्रांत ते जवान तैनात होतील. दुर्गम भागांतही जाऊ शकणारी वाहने, स्नो स्कूटर्स, ट्रकही आयटीबीपीकडून सीमाभागांत पाठवले जात आहेत.
गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनलगतच्या सीमाभागांत भारताकडून सुरक्षा आणि गस्त वाढवली जात आहे. त्यादृष्टीने आयटीबीपीच्या हालचाली महत्त्वाच्या आहेत.