वैजापूर – समृद्धी महामार्गाचे काम अद्यापही काही ठिकाणी अर्धवट असून, याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. असाच काही प्रकार वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडला. मात्र या घटनेनंतर शेतकऱ्याने घेतलेल्या भुमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. समृद्धी महामार्गावरील अर्धवट नाल्यांमुळे कांदा चाळीत पाणी शिरल्याने संतप्त या शेतकऱ्याने थेट समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर ट्रॅक्टर आडवा लावला. शेतकऱ्याचे तब्बल 500 क्विंटल पेक्षा जास्त कांद्यांचे नुकसान झाले आहे.
वैजापूर तालुक्यातील जांबरगाव परिसरातील महामार्गावरील अर्धवट नाल्यांमुळे पावसाळ्यात पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाते. दरम्यान गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी समृद्धी महामार्गावरून वाहत दोन्ही बाजूच्या शेतात शिरले. गट क्रमांक 31 मधील सुनील भोसले, जनार्दन भोसले, पोपट भोसले, दीपक भोसले व गट क्र. 50 मधील देविदास साठे, राजेंद्र साठे यांच्या शेतात हे पाणी शिरले होते. तसेच जांबरगावच्या बाजूला असलेल्या साठे यांची समृद्धीलगतच शेतात कांदाचाळ आहे.
पाणी शेतात शिरल्यावर साठे यांचा कांदा पाण्यात भिजला. कांदाचाळीत गुडघाभर पाणी जमा झाल्याने कांदा त्यावर तरंगू लागला. चाळीत पाणी शिरल्याचे समजल्यावर साठे यांनी तत्काळ शेतात धाव घेतली. तसेच मेहनतीने पिकविलेला कांदा पाण्यात भिजून खराब झाल्याने संतप्त साठे यांनी थेट ट्रॅक्टरसह समृद्धीवरील टोलनाका गाठला. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आलेली वाहने ज्या ठिकाणी उतरतात तेथेच साठे यांनी आपला ट्रॅक्टर आडवा लावून वाहतूक बंद पाडली.