पिंपरी, दि. 28 – वीजचोरीमुळे वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमुळे आनंदनगरमधील वीजपुरवठा सहा दिवस विस्कळीत झाला होता. सध्या सुरू असलेल्या परीक्षा, तापता उन्हाळा या बाबी लक्षात घेत, या भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीची दखल घेत, महावितरणने याठिकाणी तत्काळ एका ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केल्याने या भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी, कामगार व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिंचवड स्टेशन परिसरात असलेल्या आनंदनगर परिसराची सुमारे 15 हजार लोकसंख्या असून, वीजचोरीमुळे या भागातील ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण आल्याने त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊन, या भागाचा वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने, गेली सहा दिवसांपासून या भागाचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यातच वातावरणातील बदलाने उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक चांगलेच हैराण झाले होते. या सर्वांनी ही समस्या माजी नगरसेवक शैलेश मोरे, काळूराम पवार व सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांच्या कानावर घातली.
या भागातील सुमारे 100 नागरिकांसह या सर्वांनी महावितरणच्या आकुर्डी, थरमॅक्स चौकातील महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे आणि सहाय्यक अभियंता कृतिका भोसले यांनी नागरिकांशी चर्चा केली. या विभागात आकडे टाकून लाइट घेतल्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण आल्याने या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण होतो. त्यामुळे हे आकडे काढून टाकावेत संबंधित आकडे टाकणाऱ्या नागरिकांनी अधिकृत मीटर घेऊन नियमित बिले अदा करावीत असे सुचविण्यात आले.
दरम्यान, या भागातील नागरिकांना चुकीची वीजबिले आल्याने थकीत रक्कम मोठी असल्याने ही रक्कम नागरिक भरू शकत नसल्याचे सांगण्यात आले. तर यावर पर्याय म्हणून चुकीच्या वीजबिलांची छाननी करून, त्यामध्ये बदल केल्यास, थकीत वीज बिल नागरिक भरतील. त्यांना अधिकृत वीजमीटर उपलब्ध करुन द्या, याबाबत आपण महावितरणच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या सर्व बाबींचा विचार करून या बाता नव्याने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून, या भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.