मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, सीमावाद यांसह विविध मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी साधू-संतांच्या अपमानावरून सरकारला चांगलेच फटकारले.
अजित पवार म्हणाले, तुकाराम महाराज यांच्याविषयी अपशब्द हा महाराष्ट्र कदापी खपवून घेणार नाही. बागेश्वर महाराज याने जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल नागपूरमध्ये गरळ ओकली. बेताल वक्तव्य केले. महापूरुष तर झालेच झाले आता साधू संतांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत साहित्याचा अभ्यास नसताना मनात येईल त्याप्रमाणे कोणी संतांचा अपमान करणार असेल तर सरकारने याची दखल घ्यायलाच हवा. या महाराजाविरूद्ध गुन्हा दाखल करायला हवा, मात्र सरकार शांत आहे. महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत चुकीचे वादग्रस्त वक्तव्य केले होते, यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यावरून आज पवार यांनी विधानभवनात अर्थसंकल्प अधिवेशनात सरकारचा समाचार घेतला.