आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवत 13 वर्षांपूर्वी “विद्यादाना’ची एक चळवळ उभी राहिली. एका हाताला अनेक हात जोडले गेले आणि “दिशा परिवारा’ची स्थापना झाली. विश्वास, सचोटी व पारदर्शकता या त्रिसूत्रीमुळे समाजाच्या विविध घटकांतील, देश-विदेशातील दाते याच्याशी जोडले गेले. यंदाही 225 विद्यार्थ्यांना 60 लाख रुपयांची मदत केली आहे. एका अर्थाने आज “दिशा परिवार’ दातृत्वाचा अव्याहत स्रोत बनला आहे.
2020 साल उजाडताना करोनासारखे दु:स्वप्न मानवजातीला पडले. जगभर या महामारीने थैमान घातले आहे. देशात आणि राज्यातही याचे परिणाम जाणवत आहेत. या संसर्गजन्य रोगामुळे आजही संपूर्ण व्यवहार रुळावर आलेले नाहीत. आर्थिक उलाढाल अजूनही मंदावली आहेच. शाळा, कॉलेजही बंद आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर अनेकांना पगारकपातीला सामोरे जावे लागले आहे. रोजच्या जगण्यासाठी येथे संघर्ष सुरू आहे. “दिशा परिवारा’सारख्या सामाजिक संस्थांसाठी तर हा काळ प्रचंड कठीण ठरला. कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या, उद्योजक “सीआरएस’ फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करत असतात. पण संपूर्ण जीवनचक्रच ठप्प झाल्याने मदत येणार कोठून? हा प्रश्न होता.
अशा प्रतिकूल परिस्थितीत करोनामुळे टाळेबंदीचा काळ असतानाही संस्थेने दात्यांशी संपर्क साधून 60 लाख रुपयांचा निधी उभारला; तोही केवळ फोन कॉलवर! आश्चर्य वाटले ना हे वाचून! पण हे सत्य आहे! संस्थेने निर्माण केलेली विश्वासार्हता यास कारणीभूत आहे. 13 वर्षांपूर्वी विद्यार्थी ही “जात’ आणि शिक्षण हा “धर्म’ मानत जात-धर्मविरहित ही शैक्षणिक चळवळ दिशाने सुरू केली. त्यामागील प्रेरणाही तितकीच महत्त्वाची आहे. सध्या शिक्षण हा एक धंदा बनला आहे; त्याचे बाजारीकरण झाले आहे. “आहे रे’ आणि “नाही रे’ वर्गातील दरी वाढत गेल्याने समाजातील गरीब घटकाला प्राथमिक शिक्षण घेणेही दुरापास्त बनले आहे; तेथे उच्च शिक्षणाची काय कथा! अशाच गुणवंत विद्यार्थांचे शिक्षण केवळ पैशांअभावी थांबू नये म्हणून संस्थेचे राजाभाऊ चव्हाण आणि त्यांचे सहकारी पुढे सरसावले. हा महारथ चालविणे काही एकट्या-दुकट्याचे काम नव्हते. त्यासाठी मोठा निधी हवा होता. असे म्हणतात की, ज्यामध्ये देणारा व घेणारा दोघेही समाधानी असतात; तेच सत्पात्री दान असते! हाच विचार आम्ही दोन हातांतील अंतर कमी करतो, या ब्रीद वाक्यानुसार पारदर्शक कारभार करत संस्थेने पटवून दिला. दात्यांना हा विचार इतका भावाला की, या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झाले. ते केवळ दात्यांच्या दानशूर, परोपकारी वृत्तीमुळेच!
दिशाच्या या वाटचालीत दात्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत; ज्या एक दंतकथा ठरतील! सद्यस्थितीविषयी सांगायचे झाल्यास; मुंबईच्या एक दात्या! त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ते दु:ख बाजूला सारून त्यांनी विद्यार्थिनीची गैरसोय होऊ नये म्हणून त्याही स्थितीत मदत सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या प्रियजनांच्या स्मृती जतन करताना अनेक जण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक शिष्यवृत्ती देत असतात. त्याची एक साक्ष म्हणजे संस्थेने वाघोली येथे उभारलेल्या “सरोज भवन’ मुलींच्या वसतिगृहातील ग्रंथालयासाठी सुनिती मराठे यांनी आपल्या सासूबाई पुरंदर मराठे यांच्या नावे दहा लाख रुपयांची देणगी दिली. या उपक्रमाशी गेली अनेक वर्षे अनेक उद्योजक, संस्था जोडल्या गेल्या आहेत. सुबोध म्हात्रे यांनीही वसतिगृहाच्या उभारणीसाठी भरीव मदत केली. “दैनिक प्रभात’च्या अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तर दरवर्षी या गरजू विद्यार्थ्यांना
5 लाख रुपयांची मदत देण्यात येते.
अन्नदान, जलदान, वस्त्रदान, रक्तदान, भूदान, गो-दान, नेत्रदान, देहदान असे अनेक प्रकारचे “दान’ असते. दिशा परिवाराने सुरू केलेले “विद्यादान’ही याच प्रकारातले! शिक्षणामुळेच जीवनाचा स्तर उंचावू शकतो; यावर संस्थेचा विश्वास आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दात्यांच्या माध्यमातून मदत केली जाते. यंदा करोनाच्या काळात विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आणि त्याआधारे 225 विद्यार्थ्यांना 60 लाख रुपयांची मदत देण्यात आली. अधिकाधिक दात्यांना या उपक्रमाशी जोडून ही लोकचळवळ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी राजाभाऊ चव्हाण यांच्यासह महेंद्र खंडेलवाल, नंदकुमार रोजेकर, अरुण कुलकर्णी, पूर्णिमा जानोरकर, निखिल पडवळ आणि अन्य सहकारी सतत कार्यरत असतात. दिशा परिवारातील दाते सर्व घटकांतील आहेत. दानासाठी पैशांची नव्हे तर मनाची श्रीमंती महत्त्वाची असते; हेच येथे अनुभवास येते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून एखादा भाजी विक्रेता, रिक्षाचालक किंवा छोटा व्यावसायिक आपल्या तुटपुंज्या कमाईतून विद्यार्थ्यांना मदत करतो. तर आपल्या गरजा भागल्यानंतर पेन्शनमधील मोठी रक्कम या विद्यार्थ्यांना देऊ करणारे आजी-आजोबाही आपल्याला इथेच भेटतात. या आत्मकेंद्री समाजात आपल्या परोपकारी वृत्तीमुळे या दात्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी… “…तेथे कर माझे जुळती’ ही भावना मनात आपोआपच दाटून येते!
दातृत्व
अंजली इंगवले