सुप्रसिद्ध लेखिका डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची “महाश्वेता’ ही एक अत्यंत गाजलेली कादंबरी. एकीकडे कौटुंबिक स्वरूप प्राप्त
झालेली ही कादंबरी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक प्रश्नाला तोंड फोडताना दिसते. या कादंबरीची नायिका सुधा एक अत्यंत सुंदर, शालीन, सोज्वळ, मर्यादाशील युवती आहे. या नायिकेभोवती कादंबरीची वीण घडत जाते आणि हळूवारपणे वाचकाला केव्हा ताब्यात घेते ते कळतही नाही.
सुधा एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील मुलगी. तिचे वडील कुठल्याशा ठिकाणी कारकुनाची नोकरी करणारे. घरी सुलभा, जया, नंदू अशी तीन भावंडं. नक्षत्रासारख्या देखण्या सुधाचे मिरजजवळच्या हिरवळ या गावच्या इनामदारांच्या धाकट्या मुलाशी अर्थात माधवशी लग्न होते. माधव दिसायला राजबिंडा, रसिक आणि सुधावर प्रेम करणारा मुलगा. सारे काही सुखनैव सुरू असताना एक दिवस या सुखाला दृष्ट लागते. लग्नाला दोन वर्षे झालेली असतानाच एक दिवस सुधाच्या मांडीवर पांढरा चट्टा उमटलेला माधवच्या नजरेस पडतो. तो डाग कोडाचा आहे हे माधवच्या लक्षात येते आणि त्याच्या अंगावर जणू वीज कोसळते.
वास्तविक सुधाचा यात कुठलाही दोष नसतो; परंतु आपल्या पत्नीला कोड झाले आहे, हे माधवच्या दृष्टीने कमीपणाचे असते. माधवच्या घरात त्याचे वडील बंधू तात्यासाहेब, घरातील कारभारावर एकहाती अंमल ठेवणाऱ्या धाकट्या काकू, तात्यासाहेबांची पत्नी असा परिवार असतो. हिरवळला इनामदारांचा चार चौकांचा वाडा असतो. प्रचंड श्रीमंत असणारे हे घराणे सुनेला कोड निघाले म्हटल्यावर सुधाला जणू त्यांनी वाळीतच टाकले. कालपर्यंत राणीसारखी असणारी सुधा रात्रीतून आपले स्थान गमावून बसते. तिला स्वयंपाकघरात प्रवेश बंद होता. सोवळे ओवळ्याचे अवडंबर करणाऱ्या धाकट्या काकूंना ती डोळ्यासमोरही नको वाटते. माधवची रसिकदृष्टीही तिला नाकारते. इनामदारांच्या इभ्रतीला जणू या कोडाने धक्काच पोहोचतो. सगळे तिला टाळायला लागतात.
सुधाच्या कोडावर घरच्या घरी बरेच उपचार केले जातात. घराण्याचे वैद्य गदाधरपंत शास्त्री बारकाईने तपासणी करून हे कोडच आहे याची खात्री देतात. शालीन सुधा आपल्या मांडीवरचे कोड दाखविताना कमालीची संकोचते. वैद्यबुवा या व्याधीला “श्वेतकुष्ट’ म्हणून संबोधतात. घरातले छोटे बाळही सुधाच्या हाती आता कोणी देत नाही. संस्कारशील सुधाची प्रचंड कुचंबणा होते. चुलत सासूबाई वाटेल तसे बोलतात आणि नवऱ्याचा कोणताही आधार उरत नाही. अखेरीस सुधाला माहेरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात येतो. तात्यासाहेब सुधाला माहेरी सोडवतात. नेमके त्याच दिवशी सुधाची बहीण सुलभाच्या लग्ननिश्चितीचा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम घरात होत असतो. तो पार पडल्यानंतर सुधा माहेरी का आली आहे, हे कळते, तेव्हा सुधाच्या घरी आभाळ कोसळते.
काही दिवसांनी सुधाच्या कोडाची बातमी समजल्यावर सुलभाचे जमलेले लग्न मोडते. सुधाचे माहेर विस्कळीत होते. सुधाची आई निनी कमालीची सोशिक बाई असते. ती सुधालाही सांभाळते आणि सुधाचे वडील हरीभाऊ यांनाही. एक चांगले घर या साऱ्या प्रकाराने दुभंगते. माहेरी आलेली सुधा कोडावर अनेक औषधोपचार करते. तिची आई आणि ती वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्ये करू लागतात. पण सुधाचे कोड जाण्याऐवजी वाढू लागते. सुधाला मृत्यू जवळ करावासा वाटतो. पण ती वेळोवेळी स्वत:ला सावरते. सात-आठ महिन्यांत इनामदारांकडे हरीभाऊ अनेक पत्रे पाठवतात; पण त्या पत्रांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आपला कमीत कमी त्रास कसा होईल याची काळजी सुधा घेत असली तरी सुलभाच्या मनात तिच्याविषयी लग्न मोडल्यामुळे राग निर्माण होतो.
काही कालावधीनंतर एक दिवस अचानक अनेक वर्षांनी सुधाची मोठी मावशी तिच्या पतीसमवेत सुधाच्या घरी येते. मावशी काशीयात्रेला निघालेली असते. ती तिच्यासोबत सुधाला घेऊन जाते. जाताना नागपूरला सुधाला एका मोठ्या डॉक्टरांकडे पुन्हा एकवार तपासणीसाठी मावशी घेऊन जाते. पण कोडावर उपचार मिळत नाहीत. पुढे काशी करून सारेजण हरिद्वारला येतात आणि सुधा हरिद्वारच्या प्रेमात पडते. हरिद्वारला तिची भेट राम मंदिरात राहणाऱ्या कौशल्यामय्या नामक अत्यंत प्रेमळ वृद्धेसोबत होते. कौशल्यामय्याला या तरुण मुलीविषयी विशेष ममत्व वाटते आणि सुधा मावशीसोबत पुढे जाण्याऐवजी हरिद्वारलाच राहण्याचे ठरवते. सुधाचे परोपकारी वागणे-बोलणे यामुळे अल्पावधीतच ती मय्यासोबत दुधात साखर मिसळावी तशी मिसळते.
हरिद्वारचे धार्मिक वातावरण, यात्रेकरूंची गर्दी, कौशल्यामय्याचे सान्निध्य यामुळे सुधा तिचे सारे दु:ख विसरते. दरम्यान, सुधाची आनंदस्वामी या अत्यंत वेगळ्या तरुणाशी मय्याच्या घरी भेट होते. हा तरुण अनाथ मुलांचा सांभाळ नि:स्वार्थ भावनेने करीत असतो. आनंदस्वामी पदवीधर असतात. कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता अनाथ मुलांची काळजी घेणाऱ्या या वेड्या माणसाचे सुधाला खूप कौतुक वाटते. या मुलांपैकी एका मुलाला अचानक ताप येतो. त्याची सर्व काळजी सुधा घेते आणि त्याला जवळजवळ मृत्यूच्या दारातून परत आणते. तेथून आनंदस्वामी आणि सुधामधल्या अत्यंत निर्मळ अनामिक नात्यास प्रारंभ होतो. आनंदस्वामी एका छोट्या जागेत मातीच्या घरात राहात असतात. आनंदस्वामींवर लोभ असलेल्या विद्याबहन नावाच्या एका धनाढ्य घरच्या स्वामिनी हरिद्वारमधील त्यांची जागा आश्रमासाठी दान म्हणून देतात. शिवाय आश्रम बांधण्याचा खर्चही उचलतात.
अल्पावधीत आश्रम तयार होतो. तेथील सगळे व्यवस्थापन सुधा बघू लागते. आनंदस्वामी सुखावतात. कौशल्यामय्यांना समाधान वाटते. याच दरम्यान माधवचा चित्रकार मित्र सुरेश हरिद्वारला येतो आणि साथीच्या आजाराने बेशुद्ध होऊन पडतो. योगायोगाने त्याला आश्रमात आणले जाते. त्याची सेवा सुधा करते आणि सुरेशला हे सगळे अनुभवल्यानंतर भौतिक सुखातील मिथ्यत्व जाणवते. तो गावी परततो तेव्हा एका वेगळ्या सुरेशचा जन्म झालेला असतो. तो हे सारे माधवला सांगतो; पण सुधा हीच माधवची पत्नी आहे हे मात्र त्याला समजत नाही. अर्थात, माधवला मात्र ती सुधाच आहे की काय असा संशय येतो.
सुधाच्या माहेरच्या परिचित महिला एक दिवस हरिद्वारला सुधाला भेटतात. त्यांच्याकडून घरची सारी हकीगत सुधाला कळते. सुधाच्या वडिलांचे प्रमोशन होते. सुलभा सिनेमात काम करू लागते. धाकटी भावंडं व्यवस्थित मार्गी लागतात. आईच्या चिंता कमी होतात. अर्थात सुधाचा आईशी नियमित पत्रव्यवहार असतोच. सुरेशकडून कळलेले वर्णन ऐकून माधवला उपरती होते आणि तो सुधाला स्वीकारण्यासाठी तिच्या गावी येतो; पण हरिभाऊंची आता कोल्हापूरला बदली झाल्याचे कळते. त्यासोबतच सुधा आता हरिद्वारला असल्याचेही समजते. माधव हरिद्वारला सुधाच्या ओढीने येतो. आश्रमात पोहोचतो पण आता सुधा सुखदु:खाच्या पलीकडे गेलेली असते. ज्यावेळी नवऱ्याने स्वीकार करावा असे तिला अंतर्यामी वाटत असते त्यावेळी ते होत नाही आणि आता नवरा आला तरी तिच्या रोजच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही.
सुधाचा नवरा आल्याचे पाहून स्वामीजींना धक्का बसतो. सुधा माधवला परतण्यास सांगते. पण तो जात नाही आणि स्वामीजी मात्र हृषिकेशला निघून जातात. कादंबरीच्या अखेरीस एकट्या बसलेल्या माधवला सुधा आश्रमात परत आणते आहे असे दिसते.
कथाकथनाच्या ओघात संतोष, डॉ. गोखले, डॉ. अरुणकुमार मुखर्जी या पात्रांचा उल्लेख येतो. पण मुख्य पात्र या कादंबरीची नायिका सुधाचे हे परिपक्व, समंजस आणि कनवाळू व्यक्तिमत्त्व लेखिकेने अतिशय मनोज्ञ पद्धतीने रेखाटले आहे.
पुस्तकातील माणसं
डॉ. विनोद गोरवाडकर