जामखेड – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना 16 फेब्रुवारीला घडली. शीतल रामदास वायभसे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडिल भानुदास गीते यांनी जामखेड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेचा पती, सासू, दीर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी पती रामदास वायभसे यास पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, त्यांना लवकर अटक करावी, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा विवाहितेच्या पित्याने घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भानुदास गीते यांची कन्या शीतल रामदास वायभसे हिने सासरच्या जाचाला कंटाळून दि १६ फेब्रुवारी रोजी सासरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मयताचे वडील यांनी दि १६ फेब्रुवारी रोजीच जामखेड पोलीस स्टेशन मध्ये पती रामदास बळीराम वायभसे, सासू कुसुम बळीराम वायभसे व दीर लखन बळीराम वायभसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. दरम्यान आरोपी रामदास बळीराम वायभसे याना दि. १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र अद्याप कुसुम वायभसे, लखन वायभसे हे फरार असून त्यांच्याकडे मुलीचे पाच महिन्याचे बाळ आहे.
आरोपींकडून बाळासह आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. एक महिना होऊनही आरोपीना अटक झाली नाही. तसेच फरार आरोपी व त्यांच्या नातेवाईकांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत असून जीवे मारण्याची धमक्या दिली जातेय. बाळ आमच्या ताब्यात मिळावे, या प्रमुख मागणीसह भानुदास गीते यांनी कुटुंबियांसमवेत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी आरोपींना आठ दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत आरोपीना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्र घेतला आहे.