पुणे : करोना पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांनी मंदिरांमध्येच गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने विसर्जन आणि सांगता सोहळ्यालाही गर्दी होऊ नये, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने “श्रीं’चे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या 128 व्या वर्षी सुरू असणाऱ्या उत्सवात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.
दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी. समस्त पुणेकरांनी आणि गणेशभक्तांनीदेखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले.