पुणे -कोणताही आणि कितीही मोठा कलाकार असाल तरी त्याच्याकडे अपमान, नकार पचवण्याची ताकद असलीच पाहिजे. अपमान का झाला, हे समजून घेऊन काय करायचे नाही, हे ठरवले की आपण योग्य दिशेने जातो. प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते, मात्र पुन्हा-पुन्हा एकच चूक होऊ नये, या मतांचा मी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मंगळवारी व्यक्त केले.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिराच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “थेट भेट’ या कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला. छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुख असते. आजपर्यंत झालेल्या 12 हजार 723 प्रयोगातील केवळ दोन प्रयोग रद्द करावे लागले, कारण माझा आवाजच बसला होता. माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवे होते ते मिळत नाही, असे वाटून एकदा थांबावे वाटले. परंतु मग दुसरे काय करणार असा प्रश्न पडला, असे सांगून निर्माता म्हणून माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे, याचीही जाणीव झाली यामुळे मी तो विचार मनातून काढून टाकला आणि जोपर्यंत माझे पाय चालतात तोपर्यंत रंगभूमीची सेवा करणार असल्याचे दामले यांनी नमूद केले.
दामले म्हणाले…
- मला काही बदलायच्या वगैरे भानगडीत पडायला आवडत नाही.
- मी नव्याने करण्यावर विश्वास ठेवतो.
- यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल बंद होते, ते सुरू केले.
- नाट्यसंमेलन ही एक महत्वाची जबाबदारी आहे. ती पार पडणारच.
- नवोदित कलाकारांना मुंबईत आसरा कसा द्यायचा, यावर प्राधान्यक्रमाने विचार करतोय.
- नाट्यगृहांची दुरवस्था दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाट्य परिषदेच्या सर्व शाखांचे ऑडिट करणार आहे.