– अरुण गोखले
एक व्यक्ती एका सत्पुरुषाच्या दर्शनासाठी गेली. खरं तर ती व्यक्ती त्या गावात असताना रोज त्यांच्याकडे दर्शनाला, आरतीला आणि सत्संगाला जात असे. पण नोकरीचं निमित्त झालं आणि त्यांना ते गाव सोडावं लागलं. ती व्यक्ती दूरच्या गावी गेली आणि त्यांच्यात परिस्थितीमुळे ते अंतर पडलं. एका सुट्टीच्या निमित्ताने जेव्हा ती व्यक्ती आपल्या गावी परत आली. तेव्हा मात्र ते आवर्जून स्वामीच्या दर्शनास गेले. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतले आणि म्हणाले, “”महाराज, आपल्या नित्य भेटीत दर्शनात हे असे अंतर का पडले?”
त्यावर स्वामी म्हणले, “”अंतर? आपल्यात अंतर कुठे आहे. तू तर माझ्या जवळच आहेस.” त्यावर ती व्यक्ती आणखीनच संभ्रमात पडली. हात जोडून ती व्यक्ती म्हणाली, “”महाराज, अहो असं कसं म्हणता! तुम्ही इथे आणि मी तर तिकडे दोनशे मैल दूर. मग आपल्यात हे अंतरच नाही का?” तेव्हा त्या व्यक्तीस समजावीत महाराज म्हणाले, “”त्याचं काय आहे, दोन वस्तू या एकमेकांपासून दूर आहेत का जवळ? हे त्यांच्यामधील अंतरावरून कळत असते. पण दोन व्यक्ती या एकमेकांच्या किती जवळ आहेत किंवा किती दूर आहेत हे कशावरून ठरते माहीत आहे का? ते ठरते तुमच्यातील मनाच्या अंतरावरून.
जी व्यक्ती तुमच्या मनात आहे ती तुमच्यापासून कितीही दूर असली तरी ती तुम्हास दूरची वाटत नाही. कारण, त्या व्यक्तीने तुमच्या मनात घर केलेले असते. उदाहरणार्थ, तुमचा परदेशात गेलेला मुलगा, नोकरीच्या निमित्ताने तुमच्यापासून तो किंवा त्याच्यापासून दुरावलेले तुम्ही एकमेकांना अंतराने दूर असलात तरी दूरचे वाटता का? तुम्हास एकमेकांचा विसर पडतो का? नाही ना. कारण, तुमच्या मनात ज्यांनी ज्यांनी घर केले आहे, ते सगळे कितीही दूर असले तरी तुमच्या जवळच असतात.
प्रत्यक्षात मात्र दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ बसले असले, एकत्र राहात असले तरी ते मनाने दूरच असतात. हे अंतर मनानीच निर्माण केलेलं असतं. ते मनानीच तोडायचं आणि जवळीक जोडायची असते. मग ती जवळीक दोन व्यक्तीतली असो नाही तर आपण आणि देव यांच्यातली असो.” हा बोध त्या व्यक्तीला तिच्या “किती अंतर, किती दूर’ या प्रश्नाचे उत्तर देऊन गेला.