अमरावती – अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यु, मलेरिया आणि हिवतापाने कहर केला आहे. वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा रुग्णालयातील बाल रोग वार्डात बेड कमी पडत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आलेल्याचे चित्र आहे. बाल रोग वार्डात सध्या ५९ बालके उपचार घेत आहेत असून ग्रामीण भागातही बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे चित्र आहे.
अमरावती महानगरपालिका हद्दीत डेंग्यूचे ४३ तर मलेरियाचे तीन रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील मोर्शी आणि अचलपूर येथे डेंग्यूचे मोठे हॉटस्पॉट आहेत. अचलपूरात तब्बल ३८३ तर मोर्शीत १५९ डेंग्यूचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात महिना भरात ९ रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड रिक्त नव्हते. मात्र, आता कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असली तरी डेंग्यु आणि इतर साथ रोगाने डोके वर काढल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, तसेच अजून बेड वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी दिली आहे.