कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. तृणमूलचे बडे नेते एकामागून एक भाजपमध्ये सामील होत असल्याने विधानसभा ममतांना जड जाणार असे तर्क लढवले जात होते. भाजपची प्रचार यंत्रणा, केंद्रीय मंत्र्यांचा फौजफाटा, स्वतः गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेलं लक्ष यानंतरही ममता बॅनर्जी यांनी प्रचंड बहुमतासह विजय मिळवला.
मात्र पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या ममतांना आपला विजय निश्चित करता आला नव्हता. त्यांना त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नंदिग्राममधून ममतांचा पराभव झाल्याने त्यांना पोटनिवडणुकांना सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले होते.
अशातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूकांबाबतची सूचना जारी केली आहे. बंगालमधील भवानीपूर, समशेरगंज व जंगीपूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० सप्टेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत. त्याचा निकाल ३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, ममता बॅनर्जी या सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून या संवैधानिक पदावर त्यांना कायम राहायचे असल्यास ही निवडणूक त्यांना जिंकावी लागणार आहे. त्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. भवानीपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ मनाला जातो.
तत्पूर्वी, ममतांचे निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकांपूर्वी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देत आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडत नंदीग्राम येथून निवडणूक लढवली. नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे ममतांचा १९५६ मतांनी निसटता पराभव झाला होता.
राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देखील तृणमूल विरुद्ध भाजप असा संघर्ष थांबलेला नाही. निवडणुकांनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करून त्यांना जीवे मारण्यात येतंय, स्त्रियांवर बलात्कार केले जातायेत असा आरोप भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेसवर केला होता. तृणमूलने हे आरोप नाकारले आहेत.
पश्चिम बंगाल भेटीसाठी आलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. भाजप नेत्यांनी हा हल्ला तृणमूल पुरस्कृत असल्याचा आरोप करत जर केंद्रीय मंत्र्यांवर हल्ले होत असतील तर सामान्य जनतेचं काय प्रश्न उपस्थित केला होता.
ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासोबतही खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकांपश्चात उफाळलेल्या हिंसाचारानंतर धनखर यांनी कूच बिहारचा दौरा केला होता. राज्यपालांच्या या भेटीगाठींवर तृणमूलने जोरदार आक्षेप घेतलेला. तसेच ते भाजप धार्जिणे असल्याची टीका करण्यात आली होती.
अशातच मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममतांसाठी ही पोटनिवडणुक जिंकणं अनिवार्य आहे. विधानसभेवेळी भाजपने निवडणुकांनंतर ममतांना नावापूर्वी माजी मुख्यमंत्री लावावं लागेल असा दावा केला होता. ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने भाजपचा हा दावा फोल ठरला होता. मात्र आता पोटनिवडणुकांमुळे भाजपला आपला दावा पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.