गोंदिया: गेल्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागून फडणवीस सरकार सत्तेत आले. पण जनतेची फसवणूक करण्याशिवाय या सरकारने काहीच केलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सडक अर्जुनी येथील सभेत केला.
आवळा देऊन कोहळा काढण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. ७२ हजाराची मेगा भरती करू, अशी घोषणा या सरकारने केली होती. पण इथे तर अनेक कंपन्या बंद होत आहेत, तर तरुणांच्या हाती असलेले रोजगार निघून जात आहेत. मग कुठे गेली मेगाभरती? असा संतप्त सवाल देखील कोल्हे यांनी उपस्थित केला.
शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील आजच्या दुसऱ्या दिवशी गोंदियातील सडक अर्जुनी येथे पार पडलेल्या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल पटेल, खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रुरुपाली रुपाली चाकणकर तसेच प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी संबोधित केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील देखील उपस्थित होते.
प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी देखील सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत ३७ निर्णय घेतात. पण रोजगार ठप्प झालाय, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, महिला सुरक्षित नाहीत. लोकांच्या मनात या सरकारबद्द्ल राग असतानाही हे पुन्हा निवडून येण्याची भाषा कशी करतात, असा प्रहार मिटकरी यांनी केला. या भागात अनेक ओबीसी-तेली समाजाचे भाऊबंधू आहेत. या सरकारने या समाजाचा अनेक ठिकाणी अपमान केला. असल्या असंवेदनशील सरकारला घालवायचं आहे, असेही ते म्हणाले.