इंफाळ – राज्यातील भाजप सरकारने मणिपूरला दहशतवादापासून मुक्त करून विकासाच्या मार्गावर आणले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. अमित शहा यांनी 300 कोटी रुपयांच्या 12 प्रकल्पांचे उद्घाटन आणि 1,007 कोटी रुपयांच्या नऊ प्रकल्पांची पायाभरणी केल्यानंतर बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथे जाहीर सभेला संबोधित केले.
त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजप सरकारने बंडखोरीचा पराभव केला आणि सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा,उठवला तसेच राज्यात सतत होणारे बंदचे वातावरण नाहीसे केले. त्यामुळे राज्य विकासाच्या मार्गावर गेले असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, “मणिपूरमध्ये कॉंग्रेसच्या राजवटीत दहशतीची परिस्थिती होती. आता हे राज्य छोट्या राज्यांमध्ये सर्वोत्तम शासित राज्य ठरले आहे. त्यांनी दावा केला की केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ईशान्येत 3.45 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कालावधीत 51 वेळा या प्रदेशाला भेट दिली आहे.
मणिपुरातील एन बिरेन सिंग सरकार अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापराच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. त्यातून भाजप पुढील निवडणुकीत मणिपूरला अंमली पदार्थमुक्त करेल.