नवी दिल्ली – नक्षलवाद हा मानवतेला लागलेला शाप आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या विचारसरणीचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. नक्षलवादाच्या विरोधातील एका परिषदेच्या निमीत्ताने एक्स वर दिलेल्या निवेदनात त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्यांनी नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे.
नक्षलप्रभावित राज्यांची ही बैठक आज येथे सुरू झाली. त्या बैठकीला बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य, झारखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बंगाल आणि केरळमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तसेच या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे उच्च अधिकारी आणि केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
नक्षलविरोधी मोहीमा प्रभावीपणे राबवणे आणि संपुर्ण देश नक्षल मुक्त करणे हे आमचे उद्दीष्ठ आहे असेही अमित शहा यांनी नमूद केले आहे. या बैठकीत नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.
केंद्र सरकारचे असे मत आहे की जोपर्यंत डाव्या विचारसरणीच्या प्रभावातून देश मात्र मुक्त होत नाही तोपर्यंत नक्षल दहशतवादाने त्रस्त राज्याला आपली खरी क्षमता ओळखता येत नाही. गेल्या अनेक दशकांपासून या डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचे सुरक्षा व्यवस्थेपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाईल असा निर्धारही केंद्र सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या धोरणाच्या अनुषंगाने गृह मंत्रालय सुरक्षा दलांना आवश्यकत्या सोयी सुविधा पुरवत आहे, त्यात आधुनिक शस्त्रास्त्रे, हेलिकॉप्टर्स, वाहने अशा सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. नक्षलप्रभावित भागातील संपर्क यंत्रणाही कार्यक्षम केली जात आहे.