नवी दिल्ली – ग्राहक किंमत निर्देशांक जास्तीतजास्त 4 टक्के इतका असावा अशी मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने घालून दिली आहे. पण गेले 47 महिने हा दर त्यापेक्षा कितीतरी अधिक राहिला असून त्यामुळे देशातील कोट्यवधी कुटुंबांना महागाईच्या तीव्र झळा बसत आहेत.
पण सरकार त्या अनुषंगाने काहीही उपाययोजना करण्यास तयार नाही अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने आज आपले पतधोरण जाहीर केले. त्यातही हीच बाब ध्वनीत झाली आहे असेही रमेश यांनी नमूद केले आहे.
रमेश म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने ने रेपो रेट 6.5% इतका कायम ठेवला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की महागाईची चिंता अजूनही गंभीर आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे करोडो कुटुंबांना होणारा त्रास गंभीर स्वरूपाचा आहे.
ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक 6.83 टक्क्यांवर पोहचला आहे. यातून महागाईची समस्या किती गंभीर आहे हे अधोरेखीत होते आहे असे त्यांनी म्हटले आहे.