नवी दिल्ली – फाटक्या जीन्स (रिप्ड जीन्स) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. यानंतर पुन्हा एकदा तीरथ सिंह रावत यांनी ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केले’ असे वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. यामुळे तीरथ सिंह रावत पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना तीरथ सिंह रावत यांनी चुकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले कि, करोना कालावधीमध्ये भारतामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झाले असते कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले.
इतर देशांपेक्षा भारत करोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहेत. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, ज्यांनी जगावर राज्य केले ते या करोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये ३.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे, असेही रावत यांनी म्हंटले आहे.
#WATCH “…As opposed to other countries, India is doing better in terms of handling #COVID19 crisis. America, who enslaved us for 200 years and ruled the world, is struggling in current times,” says Uttarakhand CM Tirath Singh Rawat pic.twitter.com/gHa9n33W2O
— ANI (@ANI) March 21, 2021
दरम्यान, नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तीरथ सिंह रावत यांनी ‘करोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.