पुणे – पुन्हा पुराचा धोका असल्याने आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्वरित हा सगळा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. मागच्या वर्षीचे पुरामध्ये झालेल्या नुकसानेचे रहिवाशांचे दु:ख अद्याप विस्मृतीत गेले नसताना, यावर्षीचे अस्मानी संकट पुन्हा एकदा या परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत आहे.
मागील वर्षी 25 सप्टेंबरला आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचा फटका दक्षिण पुण्याला बसला. अनेकांचे संसार वाहून गेले, मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले खरे, परंतु प्रत्यक्षात काहीच उपाययोजना जागेवर झाल्या नाहीत.
मार्चपासून करोनावर उपाययोजनेमध्ये गुंतलेल्या प्रशासनाला या भविष्यात पुन्हा उद्भवू शकणाऱ्या संकटाकडे मान वर करून पहायला वेळच मिळाला नाही. आणि आता हे संकट पुन्हा आ वासून उभे राहिले आहे. तेव्हा महापालिकेने परिसरच रिकामी करा, अशी नोटीस बजावली आहे.