मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनाच्या संसर्गामुळे निधन झाल्याने मनोरंजन क्षेत्राच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना आशालता वाबगावकर यांना करोनाची बाधा झाली आणि त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्या या आजारातून सावरू शकल्या नाहीत आणि मराठी मनोरंजनसृष्टीने एक अभिनेत्री गमावली.
आशालता वाबगावकर यांच्या मृत्यूनंतर मालिका चित्रीकरणाच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. त्या शंकांचे निरसन करूनच सध्याच्या संकटकाळात मनोरंजन क्षेत्राला वाटचाल करावी लागणार आहे. सर्वसाधारणपणे मनोरंजन क्षेत्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मालिकांचे चित्रीकरण होत असले तरी सध्या अनेक प्रॉडक्शन हाउसेस सातारा, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी आपल्या मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. अशा परिस्थितीत मालिकेशी संबंधित अनेक लोकांना चित्रीकरणस्थळी जावे लागते. त्यापैकी एकाला जरी करोनाची बाधा झाली असली आणि चित्रीकरण स्थळावर जर कोणत्याही सुरक्षेचे उपाय योजले जात नसतील, तर या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण होतो.
आशालता वाबगावकर ज्या मालिकेमध्ये काम करत होत्या, त्या मालिकेच्या चित्रीकरणाबाबत असेच काहीतरी झाले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे. मुंबईवरून आलेल्या काही नृत्य कलाकारांनी योग्य काळजी न घेतल्याने त्या ठिकाणी करोनाचा संसर्ग झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण त्यापूर्वी हे चित्रीकरण व्यवस्थित सुरू होते. सातारा जिल्ह्यातील ज्या हिंगणगाव येथे या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते तेथील ग्रामस्थांनीही या चित्रीकरणाला काही आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाही विचार करावा लागणार आहे. अर्थात, एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की, जवळपास पाच ते सहा महिने मालिकांचे चित्रीकरण बंद होते. हजारो कलाकारांची आणि कामगारांची उपासमार होत होती. मालिकांचे चित्रीकरण सुरू झाल्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे.
संबंधित वाहिनी असोत किंवा प्रॉडक्शन हाउसेस असो त्यांनी सेटवर संपूर्ण आरोग्यविषयक काळजी घेऊन चित्रीकरण सुरू करण्याची हमी दिली आहे. सॅनिटायझरचा वापर, नियमित आरोग्य तपासणी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करत असल्याची ग्वाही प्रॉडक्शन हाउसेस आणि वाहिन्या देत आहेत. तरीही अशाप्रकारे ज्येष्ठ कलाकारांना जर करोनामुळे जीवाला मुकावे लागत असेल, तर कुठेतरी, काहीतरी चुकते आहे हे मान्य करावे लागेल. मुळात सरकारने मध्यंतरी 65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणात भाग घेण्यास मनाई केली होती. नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे सध्या अनेक मालिकांमध्ये ज्येष्ठ नागरिक काम करताना दिसत आहेत. या शतकाचा महानायक असलेल्या अमिताभ बच्चन यांनीही “कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता मालिकेचे चित्रीकरण टाळणे शक्य नसल्याने प्रॉडक्शन हाउसेसनी खऱ्या अर्थाने आपल्या कलाकारांची आणि कामगारांची काळजी घेण्याची गरज आहे.
याबाबत क्रीडा क्षेत्राचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. सध्या यूएईमध्ये “आयपीएल’चा क्रिकेट हंगाम सुरू झाला आहे. स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नसताना हे सामने ठेवले जात असतानाही खेळाडूंबाबत सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. एखाद्या सामन्यामध्ये फलंदाजाने षटकार मारल्याने चेंडू मैदानाच्या बाहेर गेला, तर तो चेंडू परत वापरलाही जात नाही. आयपीएलच्या मनोरंजनासाठी संयोजकांनी “बायो बबल’ ही संकल्पना विकसित केली आहे. “बायो बबल’ म्हणजे असे विशिष्ट क्षेत्र त्यामध्ये करोनाविषयक सर्व काळजी घेतली जात आहे. या “बायो बबल’च्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीला “बायो बबल’मध्ये येण्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी आणि नियंत्रणे यांना सामोरे जावे लागते. कोणताही मोठा खेळाडू असो किंवा संयोजकांपैकी मोठा पदाधिकारी असो ठराविक दिवस विलगीकरणाची प्रक्रिया झाल्याशिवाय त्याला “बायो बबल’ क्षेत्रात प्रवेश मिळत नाही.
भारतातील मनोरंजनसृष्टीलाही अशाच प्रकारच्या एखाद्या आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. लाखो लोकांच्या पोटाचा प्रश्न असल्याने चित्रीकरण, तर थांबवता येणार नाही. पण हे चित्रीकरण जास्तीत जास्त सुरक्षित कसे होईल, याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील करोना संसर्ग प्राथमिक पातळीवर तेथेच वाढल्यानंतर तो राज्याच्या इतर भागांत गेलेल्या लोकांमुळे पसरला, ही बाब नाकारता येत नाही. मालिकेच्या चित्रीकरणामध्येही मुंबईत स्थायिक असलेल्या लोकांचा सर्वाधिक समावेश असल्याने ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे, त्या गावालाही संसर्ग वाढण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी प्रॉडक्शन हाउसेसने काळजी घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी एका मराठी वाहिनीवरील सिंगिंगच्या कार्यक्रमातील अनेक स्टार कलाकारांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले होते. या कार्यक्रमाचे चित्रीकरण मुंबईतच सुरू आहे.
वाहिन्या आणि प्रॉडक्शन हाउसेस यांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये मालिकांचे चित्रीकरण सुरू असले, तरी सेटवर होणारी गर्दी लक्षणीय असते. त्या गर्दीतील एकाला जरी संसर्ग झाला असेल आणि त्याने कोणतेही आरोग्यविषयक काळजी घेतली नसेल तर या संसर्गाचा प्रसार वाढण्यास फारसा वेळ लागत नाही. सरकारने काही विशिष्ट हेतू समोर ठेवून मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली असल्याने हे चित्रीकरण संपूर्णपणे सुरक्षित वातावरणात आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन करून होत असल्याची खात्रीही सरकारलाच करावी लागेल.
लोकांना मालिकांचे मनोरंजन हवे आहे, मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना रोजगार हवा आहे, हे वास्तव मान्य केले तरी सध्याच्या करोना महामारीच्या काळात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सर्वांनीच सर्वोच्च पातळीवरील काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडायला हवे, असाच संदेश आशालता वाबगावकर यांच्या निधनाने दिला आहे.