नाशिक :- येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रति निष्ठा बाळगून आपली व देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
लोकांच्या सेवेकरिता आपण पोलीस दलात रुजू झालो आहोत, शिस्तीत काम करीत असताना संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देऊ शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण मेडल असेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.