महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे कर्तृत्त्व, नेतृत्त्व आणि दातृत्त्वाचा संगम असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व… जनसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे राजकीय आणि विधायक नेतृत्त्व. विकासाला गती देणारे कृतिशील लोकनेतृत्त्व म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्राला आहे. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील असतात. अशा या पारदर्शक, खिलाडू, अभ्यासू, मुरब्बी, आक्रमक लोकनेतृत्त्वाचा आज वाढदिवस! त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
देशाचे लोकनेते आदरणीय शरद पवारसाहेब व पुरोगामी विचारांच्या आजी शारदाबाई पवार यांच्या नेतृत्त्वातून विधायक दिशा घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर व समाजकारणावर आपल्या आक्रमक व तत्पर कार्यशैलीने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करीत आपला ठसा उमटविला. शालेय व महाविद्यलयीन जीवनातच शेती, राजकारण, समाजकारण यांचे संस्कारही नकळतपणे त्यांच्यावर झाले.
अगदी तळागाळातील सामान्य माणसापासून तर बडया उद्योजकांपर्यंत सर्वांचे प्रश्न ते तेवढयाच तळमळीने व सहजतेने सोडवितात. सामान्य कष्टकरी, शेतकरी वर्गाशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे शेतीमातीतील माणसांना ते कधीही विसरत नाहीत. गेल्या 31 वर्षात दादांनी कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा, सहकारी बॅंक, साखर कारखाने, इ. खाती सांभाळताना प्रत्येक खात्यावर आपला ठसा उमटविला.
1991 साली राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी अल्पावधीत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जराही न थकता व विचलित न होता प्रचंड उत्साहाने काम करीत आहेत. सत्तेत नसतानाही एक सक्षम विधिमंडळ पक्षनेता म्हणून सत्ताधारी त्यांची दखल घेतात.
विकासाच्या प्रत्येक मुद्दयावर केवळ विरोधासाठी विरोध न करता समाजकारणात व विकास कामात राजकारण न आणण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे. त्यांचे संघटनकौशल्य, धडाडी, तत्परता, नेतृत्त्वगुण, तळमळ प्रशासनावरील पकड यांचे कौतुक पवार साहेबांसारख्या देशपातळीवरील दिग्गज नेत्यांपासून तर त्यांचे कट्टर विरोधकही खुल्या दिलाने मान्य करतात. स्पष्टवक्तेपणा व आक्रमक शैली हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय पैलू आहे.
सर्वसामान्य माणसाशी ते जेवढया सहजतेने जोडले आहेत तेवढयाच प्रभावीपणे कार्यकर्ते व प्रशासनातील बडया अधिकाऱ्यांवर त्यांनी अल्पावधीत आदरयुक्त वचक निर्माण केला असून मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. जनसामान्य माणूस केंद्रिभूत मानून त्यांनी गतिमान प्रशासन दिले. शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाला चालना दिली.
औद्योगिक विकासाखेरीज राज्याचा विकास होऊ शकत नाही हे ओळखून ग्रामीण भागांमध्ये उद्योजक यावेत म्हणून औद्योगिक पट्टे उभारले. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, इ.शहरे विकसित केली. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छतेचे व औद्योगिक क्रांतीचे प्रतीक म्हणूनआशिया खंडातील एक प्रगत व आदर्श महानगरपालिका ठरली आहे. एकहाती सत्ता असेल तर प्रभावीपणे विकास होऊ शकतो हे बारामती व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये केलेल्या विकास कामांवरून दाखूवन दिले आहे.
दादांनी फलोत्पादन विकासाला चालना दिली. रोजगार निर्मिती, उद्योग, पाझर तलाव, पाणीपुरवठा, वीज यांच्या संबंधिची अनेक कामे त्यांनी फलोत्पादन मंत्री असताना मार्गी लावली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. गरीब शेतकरी बागायतदार कसा होईल यासाठी धोरण निश्चित केले. पाटबंधारे खात्यावरील सर्व योजना, धरण कालवे, उपसा सिंचन योजना यांना गतिमान करून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
मा.अजितदादा हे महाराष्ट्र ऑलिपिंकचे अध्यक्ष झाले आणि खेळांना नवचैतन्य आले. राज्यातील खेळाडू हा केंद्रबिंदू मानून खेळांना प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेतले. उदा. राष्ट्रीय खेळाडूंना नोकरीत सरळ सेवेत नेमणूक व 5 टक्के जागा राखीव ठेवल्या. दादांनी कुस्तीसाठीही धोरणात्मक निर्णय घेतले. पैलवानांना मानधन देण्याच्या निर्णयाचे श्रेयही सर्वस्वी त्यांनाच द्यावे लागते. कबड्डी-खो-खो या खेळांचे अनुदानात वाढ केली. त्यामुळेच दादांमध्ये खिलाडू वृत्ती पुरेपूर भरलेली आहे. खेळावर मनापासून प्रेम करणारे, खेळाच्या विकासासाठी झटणारे दादा हे सच्चे क्रीडाप्रेमी आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, पारदर्शी स्वभाव यामुळे सामान्य माणसांना दादा आपले वाटतात. सर्वांनाच न्याय देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.
नाटयपरिषदा, सभा-संमेलने अशा विविध स्तरांतील कार्यकर्ते व कलाकारांमध्ये आपुलकी निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेत. महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांशी दादांची घट्ट वीण आहे. त्यामुळेच नाना पाटेकर, विक्रम गोखले यांसारख्या अभिनेत्यांपासून तर कवीवर्य ना.धों.महानोर, राजन खान यांसारख्या साहित्यिकांशी दादांचे आपुलकीचे स्नेहाचे नाते आहे. खेळाडूंना व ज्येष्ठ नागरिकांना मानधन योजना, गुटखा बंदी, अंधश्रध्दा निर्मूलन कायदा संमती यासारखे धडाडीचे निर्णय त्यांनी घेतले.
राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही आदरणीय दादांनी भरीव योगदान दिले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, छत्रपती शिक्षणसंस्था भवानीनगर, विद्या प्रतिष्ठान, बारामती, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, रयत शिक्षण संस्था या शैक्षणिक संस्थामध्येही दादांनी आपला ठसा उमटविला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान बहुमोल स्वरूपाचे आहे. स्व. बाबुरावजी घोलप साहेब यांनी लावलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रोपट्याचे आज मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.
विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून या संस्थेच्या माध्यमातून लाखो डोंगरी अदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोयीसुविधांनी युक्त शेैक्षणिक संकुलातून खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षणातील गुणवत्ता आबाधीत राखण्यासाठी राजकीय नेतृत्वाने हस्तक्षेप करू नये, दबाव आणू नये असे त्यांचे मत आहे. काळाची पावले ओळखून दादांच्या नेतृत्वाखाली संस्थेने उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. त्यामध्ये आर्किटेक्चरर, आयुर्वेद, फार्मसी, इंजिनिअरिंग, कम्युनिटी कॉलेजअंतर्गत डिप्लोमा इन रबर केमेस्ट्री, बी.व्होक अंतर्गत फॅशन डिझाईनिंग, फूड सायन्स टेक्नॉलॉजी, टुरिझम ऍन्ड हॉस्पिटॅलिटी, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी कॉग्नेटीव्ह एक्सचेंज, कॅलिफोर्निया, अमेरिका या संस्थेशी शैक्षणिक करार केलेला आहे.
नुकत्याच संस्थेच्या पाच माध्यमिक शाखांना केंद्र शासनाकडून अटल ट्रिंकलिंग लॅब मंजूर झालेल्या असून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांची विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनवृत्ती वाढीस मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडू नयेत या दादांच्या धोरणानुसार ब्रिलिएंटा स्कॉलर बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम केले जात आहे. त्यामुळेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास धरीत आज समर्थपणे दादांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
कोरोना या महामारीने संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाला असतांना या जीवघेण्या संकटातून आपल्या राज्याला कसे सावरता येईल यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय दादा आघाडीवर आहेत व शक्य तेवढे प्रयत्न शर्थीने करत आहेत. सर्व राज्य लॉकडाऊन असतांना दादा मात्र सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत अहोरात्र लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. कोठून येते एवढी ऊर्जा? हा प्रश्न मला अनेक वेळा त्यांच्याकडे पाहून पडला आहे.
आदरणीय पवार साहेबांप्रमाणेच “लोक” हीच दादांची
शक्ती आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष ऑनफिल्ड काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स व समाजसेवी संस्था यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच जनजीवन स्थिर करण्यासाठी दादा त्यांच्यामधील एक घटक होऊन करोना योध्दयाप्रमाणे प्रत्यक्ष मैदानात आजही लढत आहेत. त्यांना या काळात कधीही थकलेले व विश्रांती घेतलेले मी पाहिले नाही. करोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून विविध सभांचा व निर्णयांचा धडाका दादांनी अथकपणे लावला.
लोकांत मिसळून लोकभावना समजून घेत लोकहिताचे अनेक धाडसी निर्णय दादांनी घेतले. सर्वसामान्य माणसाला फोन करताच लगेच मदत करण्यास ते तत्पर असतात. त्यांना न्याय मिळवून दिल्याचे अनेक कॉल सोशल मीडियावर व्हायरल झालेले संबंध महाराष्ट्राने पाहिलेले आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने दादा आपल्या कुटुंबाचा पाठीराखा व आधार आहेत असे जनसामान्य माणसाला वाटते.
निसर्ग चक्रीवादळाच्या काळातही प्रत्यक्ष योध्दा सेनापतीप्रमाणे जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना बरोबर घेत दादा शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतः गेले. लगेच पंचनामे करत बाधितांना मदत मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांसाठी 1 लाख 50 हजार तर शेतीसाठी नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजारांची मदत 24 तासांच्या आत देण्याचे निर्देश कोणताही वेळ न दवडता त्यांनी दिले. म्हणजेच दादा हे महाराष्ट्राचे कृतीशील नेतृत्व आहे. याच काळात केंद्राकडून थकीत सोळा हजार शंभर कोटींचा निधी मिळविण्यासाठी केंद्रात त्यांनी खरमरीत पत्र दिले.
परिणामी तो निधी मिळाला आणि त्याचा निश्चितच कोरोना काळात त्याचा उपयोग झाला. प्रशासनावरील प्रचंड पकड व दरारा असलेले दादांसारखे लोकनेतृत्व अभावानेच आढळते. या कोरोना काळात आदरणीय दादांच्या नेतृत्वाचा खरा कस लागला आहे. किंबहुना ते अधिक प्रभावीपणे त्यांच्यातील उपजत क्षमतेमुळे बहरले आहे असे म्हणता येईल. याच काळात 700 हून वर्षांची वारीची परंपरा अखंडीत रहावी व शांततेत वारी पार पडावी यासाठी तमाम वारकऱ्यांना दादांनी शांततेचे आवाहन केले. त्यामुळे वारी शांततेत पार पडली.
सारथीचा प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवून 8 कोटी रूपयांचा निधी दोन तासात उपलब्ध करून देण्याचा शासननिर्णय त्यांनी काढला. एवढेच नव्हे तर या संस्थेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध व्हावी यासाठी पुढाकार घेतला. तमाम मराठा बांधवाना न्याय मिळावा म्हणून स्वतःच्या नियोजन खात्याअंतर्गत या संस्थेच्या भविष्याचीही तरतूद करून ठेवली. “सारथीसाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेल पण ही संस्था बंद पडून देणार नाही’, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या कार्यक्षमतेने प्रभावीत होवून विरोधी पक्षातील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही “अजितदादा हे सर्वात कार्यक्षम मंत्री आहेत’ हे जाहीरपणे सांगितले.
या काळातील दादांच्या कामाचा उरक व झपाटा मी स्वतः डोळयाने पाहिला आहे. आदरणीय साहेबांप्रमाणेच माझा महाराष्ट्र संकाटात असताना मी स्वस्थ कसा बसू असे म्हणत संकटांची तमा न बाळगता दादा त्यांच्याशी झुंजण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. लोकांचे प्रश्न सोडवित त्यांना आधार देण्याचे व धीर देण्याचे काम ते आजही करत आहेत.
या कोरोना काळातच साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा व इमारत उभारणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडविला. तेथील वैद्यकीय महाविद्यालयास 64 एकर जमीन देण्याचा धाडसी व लोकहिताचा निर्णय त्यांनी घेतला व तसे आदेशही दिले.
इमारतीचे बांधकाम कलात्मक, दर्जेदार व पुढील 100 वर्षांचा विचार करून करण्यात यावे. कलात्मकता, उपयोगिता व दर्जाच्या बाबतीत मला कोणतीही तडजोड नको. निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी सातारकरांना दिली. अशी दादांची प्रत्येक कामामध्ये दूरदृष्टी असते. त्यामुळेच कामे दर्जेदार व सर्वोत्कृष्ट होतात. दादा म्हणजे सर्वोत्कृष्टपणाची हमी व दर्जा हे समीकरणच महाराष्ट्रात झाले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम व्हावी व पोलीस दलावरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या नात्याने दादा नेहमीच कटीबध्द आहेत. म्हणूनच पोलीस दलात शिपाई संर्वगातील सुमारे 11000 पदे भरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्याचा फायदाही हजारो बेरोजगार युवकांना होणार आहे.
राज्यात कोणत्याही नोकरीमध्ये भूमीपुत्रांना संधी देण्याचाही निर्णयही त्यांनी घेतला. त्याशिवाय हजारो पोलिसांना घरे व कलावंताना मानधन देण्यासाठी दादा प्रयत्नशील आहेत. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी दादांची ख्याती आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील 460 मराठा आंदोलकांवरील गुन्हे त्यांनी सत्तेवर येताच मागे घेण्याचा निर्णय घेतला. आघाडी सरकारने इयत्ता पहिलीपासून इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्य करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठीही दादा सातत्याने आग्रही होते.
कोणत्याही कामात उत्कृष्टपणा, गुणवत्ता व परफेक्टनेस यांना दादा नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड ते करीत नाहीत. त्याबाबत खोटेपणा त्यांना अजितबात खपत नाही. त्यामुळेच चुकीचे वागणाऱ्या व खोटेपणा करणाऱ्या मंडळीना ते अनेक वेळा अत्यंत कडक शब्दात धारेवर धरतात. रोखठोकपणा हे त्यांच्या भाषेचे महत्वाचे वैशिष्टय सांगता येईल. त्यांनाही कुठल्याही कामात बेशिस्तपणा खपत नाही.
कुठलीही गोष्ट लपवून मुखवटा पांघरून राजकारण करण्याची प्रवृत्ती त्यांची नाही. मजे पोटात तेच ओठातफ अशी त्यांची शैली आहे. त्यामुळे अनेक लोक दुखवतात. अनेक वेळा त्याबाबत उलटसुलट चर्चा करतात. पण कडक शिस्तीचे दादा काटेरी फणसाप्रमाणे गोड आहेत. अंतरंगातून ते अत्यंत निरागस, मृदू, गोड स्वभावाचे आहेत. हे त्यांच्या जवळच्या निवडक व्यक्तींना अनेक वेळा जाणवते.
आदरणीय पवार साहेब व एखादा काळजाला भिडणारा विषय किंवा प्रश्न निघाल्यावर अत्यंत कणखर कडक व खंबीर दादा गहिवरताना व त्यांचे स्वर कातर होतांना मी अनेक वेळा पाहिले आहेत. ते जरी कडकपणे बोलले तरी त्यांच्या मनामध्ये अजिबात कटुता नसते. आपल्या सहकाऱ्यांना ते जीव लावतात व त्यांच्या सुखदुःखात धावून जातात. ते मातृह्दयी व कुटुंबवत्सल आहेत. त्यामुळेच विरोधकांचीही कामेही ते प्राधान्याने करतात.
स्वाभाविकच सर्वांनाच त्यांचा आधार वाटतो. चांगल्या कामात विनाकारण कोणीही ढवळाढवळ करू नये तसेच चांगले काम करणाऱ्यावर दबाव आणू नये यासाठी ते आग्रही असतात. व अशा लोकांना ते नेहमीच स्वातंत्र्य व पाठबळ देतात. फक्त ते काम समाजहितकारक असायला हवे व त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी घ्या हे सांगायला ते विसरत नाहीत.
जनसामान्यांची भाषा ते नेहमीच बोलतात. तिच्याशी त्यांची नाळ घट्ट जोडली आहे. त्यामुळे रोखठोक दादा कधीकधी आपल्या सूक्ष्म व तरल विनोदबुध्दी व हजरजबाबीपणामुळे सर्वांचीच मने जिंकून घेतात. त्यांच्या बोलण्यात एकप्रकारचे भाषिक सौंदर्य आहे. तसेच आतून मायेचा ओलावाही नेहमीच झिरपत असतो. हे मी स्वतः पाहिले आहे.
अलिकडच्या काळात मात्र दादा हे प्रसारमाध्यमांशी बोलतांना अत्यंत प्रगल्भपणे, समंजसपणे उत्तरे देताना आढळतात. ही वृत्ती अनुभवातून व राजकीय गुरू आदरणीय पवार साहेबांकडून त्यांच्याकडे आली आहे, हेही ते खुलेपणाने मान्य करतात. गुणवत्तेला ते प्राधान्य देतात. म्हणूनच आमदार मा.अमोल मिटकरी, खासदार मा.डॉ.अमोल कोल्हे, सामाजिक न्यायमंत्री मा.धनंजय मुंढे, आमदार मा.रोहितदादा पवार, मा.मेहबूब शेख, मा.मोहसीन पठाण, मा.रूपालीताई चाकणकर अशा गुणवान व प्रतिभासंपन्न तरूणाईला त्यांनी काम करण्याची संधी दिली आहे.
आदरणीय पवार साहेबांचा वारसा पुढे नेणारी ही तरूणांची फौज दादांच्या तालमीत तयार होत आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेण्याची सर्वसमावेशक भूमिका दादांनी सातत्याने घेतली आहे. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प त्याची साक्ष देणारा आहे. कृषी, उद्योग, पर्यटन, कला, क्रीडा, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, भाषा, अनुसूचित जाती जमाती यांना त्यांनी समन्याय व समान प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची ज्वलंत अस्मिता, धगधगणारी तोफ, बुलंद आवाज, धीरोदात्त, खंबीर सहयाद्री असे दादांना म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दादांबद्दल नेहमीच गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांना नेहमीच वादात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे विविध हितसंबंधी गट आहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा व उत्कट कार्यक्षमता हेच आहे. दादा या अपप्रचाराला बळी पडत नाहीत ते विचलित होत नाहीत. सामान्य माणसांना व तरूणांना यातील फोलपणा लक्षात आला आहे. त्यामुळेच असंख्य तरूण दादांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन राजकीय क्षेत्रात येत आहेत.
आदरणीय दादांनी करोना व राज्यापुढे उभ्या राहिलेल्या अनेक संकटांच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन तमाम महाराष्ट्रास केले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने दादांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दि.22 जुलै ते 26 जुलै पर्यंत ऑनलाईन अनंत व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे.
सदर उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसशास्त्र, औषधशास्त्र, क्राईम लॉ, स्पोटर्स, करियर गाईडन्स या विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची उपयुक्त अशी व्याख्याने ऑनलाईन पध्दतीने आयोजित करून दादांच्या विचारांनुसार त्यांना आम्ही अभीष्टचिंतन देत आहोत.
वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या या लोकनेतृत्त्वास व उपमुख्यमंत्र्यास दीर्घायुरारोग्य, शक्ती, प्रचंड ऊर्जा लाभो हीच पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील सर्व घटकांच्या वतीने सदिच्छा !
ऍड.संदीप कदम
मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे
सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.