सातारा -करोनामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व कारखाने, व्यापार, दुकाने, वडापाव, पानटपरी, हातगाडे यासारखे सर्वच उद्योग बंद होते. व्यापाऱ्यांना तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा सातारा पालिकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्याप्रमाणे साताऱ्यातील सर्वच मिळकतधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. याबाबतचा ठराव पालिकेने केल्यास त्याला नगरविकास आघाडी बिनशर्त पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, व्यापारउदीम बंद होता. यात व्यावसायिक, नोकरदार, रोजंदारीवर काम करणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या सर्वांना दिलासा मिळणे अपेक्षित आहे.
तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याच्या सातारा पालिकेच्या निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु असंख्य छोटेमोठे व्यवसाय बंद असल्याने आणि नोकऱ्या गेल्याने अनेकांना कर भरणे शक्य नाही. याचाही विचार करून पालिकेने सर्वच मिळकतधारकांना लॉकडाऊनच्या कालावधीतील घरपट्टीत सवलत द्यावी. याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तातडीने ठराव घ्यावा. त्यास नगरविकास आघाडी बिनशर्त पाठिंबा देईल.