खालापूर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. तसेच जरांगे पायी चालत मुंबईला जाणार आहेत. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची बैठक गुरूवारी (दि. ११) श्री क्षेत्र धाकटी पंढरी, ताकई-साजगाव येथे पार पडली.
यावेळी राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, दीपक पाटील, मधुकर घारे, राजेश लाड, शंकरराव थोरवे, मारुती पाटील, अनिल भोसले, किरण हडप, संकेत हडप, शिवाजी भासे, भरत पाटील, रत्नाकर बडेकर, उमेश म्हसे, भाऊ सणस, रवींद्र दिवाने, सागर म्हसे, योगेश मोरे, जयवंत पाटील, संतोष मालुसरे, चंद्रकांत पाटील, राजू नगवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानात यासाठी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. उपोषणासाठी ते पायी मुंबईला जाणार आहे. त्यांचा पायी प्रवास रायगड जिल्ह्यातूनही होणार आहे. रायगड जिल्ह्यात प्रवेश करताना जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्याचे मराठा समाजाचे नियोजन आहे. तसेच पदयात्रेत कोणते नियोजन करायचे याबाबत रायगड जिल्हा समन्वयकाची नियोजनाची बैठक श्री क्षेत्र धाकटी पंढरी ताकई- साजगाव येथील मंदिरात पार पडली.
सर्व मराठा तरूणानी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. पुढील पिढीला आरक्षण मिळावे यासाठी सर्वांनी उपोषणाकरिता मुंबईला यावे.
– दिपक पाटील, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते.