आळंदी – गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येकाने आपल्या घरावर 13 ऑगस्ट रोजी सकाळी झेंडा फडकवायचा असून तो 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता खाली उतरवायचा आहे. ‘हर घर तिरंगा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी आळंदीकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानांप्रमाणे आळंदी नगरपरिषदेकडून “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.