नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचे कारण हमीरपूर येथील अवैध उत्खनन प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहेत.
अखिलेश यांना उद्या म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी सीबीआय समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले गेले आहे हे येथे विशेष. सीआरपीसीच्या कलम १६० नुसार त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत.
हमीरपूर येथील अवैध उत्खननासंदर्भात जानेवारी २०१९ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. सरकारी अधिकाऱ्यांनी हे अवैध काम होऊ दिले असा त्यात आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या गुन्हेगारी कारस्थानात सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमित निविदा प्रक्रियेचे पालन केलेले नाही.
लोकांना अवैधपणे खनिजांच्या उत्खननाची परवानगी दिली गेली. खनिज चोरीची त्यांना परवानगी दिली गेल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे.