यवतमाळा – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे डबल इंजिनाची डबल गॅरंटी आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३,८०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे दर वर्षी १२ हजार रुपये मिळत आहेत.
किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे छोट्या शेतकऱ्यांच्या कामी येत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यवतमाळ जवळच्या भारी शिवारात बुधवारी महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण करण्यात आले.
नरेंद्र मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होते ते एकदा आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केले जायचे. परंतु, ते पॅकेजमध्येच लुटले जात होते.
गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हते. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबले आणि बघता बघता पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे.
काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहेचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. आज काँग्रेसचे सरकार असते तर जे २१ हजार कोटी रुपये आज शेतकऱ्यांना मिळाले आहेत,
त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते आणि केवळ तीन हजार कोटी लोकांना मिळाले असते. परंतु, आता भाजप सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळेल, असेही त्यांनी सांगितले.