पुणे – शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आधीच्या शिवसेना फुटीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. केसरकरांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. केसरकर यांना आम्हीच तिकीट दिल होत. ते एकेकाळचे आमचे सहकारी आहेत. म्हणून त्यांनी माहिती घेऊन बोलावे असा सल्ला अजित दादांनी केसरकारांना दिलाय. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी केसरकारांच्या आरोपांवर भाष्य केलं.
दीपक केसरकर १९९२ मध्ये आमच्याच पक्षात होते आता ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ता म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये, बारकाईने माहिती घ्यावी. तसेच अशी वक्तव्य करताना विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करायला हवीत असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच राणे आणि भुजबळ हे शिवसेनेतुन बाहेर का पडले यावर देखील अजित पवार यांनी यावेळी भाष्य केलंय.
अजित पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे १९९२ ला पहिल्यांदा शिवसेना फुटली. तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात नव्हते तर केंद्रात संरक्षक मंत्री होते. तसेच त्यावेळी शिवसेनेने मंडल आयोगाच्या विरोधात घेतलेली भूमिका छगन भुजबळ आणि त्यांच्या १८ सहकाऱ्यांना न पटल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडण्याचं कारण नाही असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
नारायण राणे यांचं शिवसेत जमत नव्हतं काही कारणावरून खटके उडत होते. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतू त्याने नारायण राणे यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेत शिवसेना सोडली. जेव्हा राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाही शरद पवार महाराष्ट्रात नव्हते ते केंद्रात कृषिमंत्री असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.