कोपरगाव – पिण्याच्या पाण्यावाचून तालुक्यातील नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. शेती उजाड झाली, जनावरांच्या चारा-पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असताना मराठवाड्याला आमच्या हक्काचे पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे नगर-नाशिकच्या नागरिकांवर अन्याय होत असून, जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, या मागणीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उद्या (गुरुवार)पासून कोपरगाव तहसील मैदानावर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगाम प्रारंभाप्रसंगी कोल्हे यांनी पाणीप्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत भूमिका स्पष्ट केली. विवेक कोल्हे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी हक्क नसलेल्या पाण्यासाठी एकत्र येऊन पाणी घेऊन जातात; पण नगर-नाशिक परिसरातील लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्यामुळे आता आपणच मैदानात उतरणार आहे. पाण्याचा वाद पेटवायचा नसेल व कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटवायचा असेल, तर घाटमाथ्यावरून पावसाचे दोनशे टीएमसी पाणी समुद्राला जाते. त्यातले 190 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येते. केवळ 25 टीएमसी पाण्याची तूट जरी भरून काढली, तरी गोदावरी खोऱ्यातील अर्थात राज्यातल्या 40 टक्के शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ होईल आणि कायमचा पाणीप्रश्न मिटेल.
पण केवळ जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी आमच्या हक्काचे पाणी सोडू नये, असे त्यांनी सांगितले. मेंढेगिरी अहवालानुसार पाणी सोडणे चुकीचे आहे. यावर्षी परिसरात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. धरणातील हक्काचे पाणी गेले, तर उरलेल्या पाण्यापैकी निम्मे पाणी पिण्यासाठी आरक्षित राहिले, तर या भागातील शेती पुन्हा उजाड माळरान होईल तेव्हा सन 2005चा समन्यायी पाणीवाटपाचा कायदा रद्द करावा.
त्यावर फेरविचार करून आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे, असेही शेवटी कोल्हे म्हणाले. या वेळी संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे म्हणाले की, यापूर्वी बारमाही पाटाद्वारे शेतीला पाणी देण्याच्या नावाखाली आमच्या हक्काच्या शेकडो एकर जमिनी सरकारने काढून घेतल्या आणि आता बारमाही पाणी द्यायचं तर दूरच आहे, ते पाणी मराठवाड्याला देऊन आमच्या परिसरातील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. जर सरकार आम्हाला बारमाही पाणी देणार नसेल, तर यापूर्वीच सीलिंग कायद्याच्या आधारे आमच्या ज्या जमिनी घेतल्या त्या आम्हाला परत द्या; अन्यथा पाणी द्या, असे म्हणत सरकारचा व पाणी सोडण्याचा निर्णय घेणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेत आपला आक्रोश व्यक्त केला.
मंत्रिपदावर डोळा असल्याने भांडायचे कोणी?
सध्या पाणीप्रश्नावर भांडायचे कोणी हा खरा प्रश्न आहे. कारण बहुतांश आमदार सत्ताधारी झाले आहेत. त्यांचा डोळा मंत्रिपदावर असल्याने भांडायचे कसं, पण मी खारीचा वाटा म्हणून पाणीप्रश्नावर मैदानात उतरणार आहे. आपण सर्वजण संघटित होऊन हक्काच्या पाण्यासंदर्भात सरकारला जाग आणावी लागणार आहे. साडेआठ टीएमसी पाणी नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात सोडले, तर या परिसराची अवस्था वाईट होणार आहे.