कोपरगाव – तालुक्यात पूर्व भागातील उक्कडगाव येथील ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेले सौ.सुशिलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय गेली दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सध्या हे विद्यालय स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पत्नी स्व.सौ.सुशिलामाई काळे यांच्या नावाने सुरू असून दरवर्षी मोठ्या दिमाखात पुण्यस्मरण सोहळा संपन्न होत होता. मात्र, दोन वर्षांपासून या शाळेत काळे कुटुंबाच्या नावाने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना पुण्यस्मरणाचा विसर पडल्यामुळे यावर्षी पंचक्रोषीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शाळेत जाऊन शिक्षकांचे कान टोचत पंचविसावे पुण्यस्मरण साजरे केले.
कोपरगाव तालुक्यात बहुतांशी शाळा, विद्यालये कर्मवीर शंकरराव काळे यांच्या योगदानातून नावारुपाला आली. यातलेच उक्कडगाव येथील सौ.सुशिलामाई काळे विद्यालय आहे. मान्यतेपासून इमारत उभारणीपर्यंत या विद्यालयास काळे कुटुंबाने जपले ,मात्र त्याचा ताबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी लावरे यांनी घेतला. या विद्यालयावर गावातील तथा काळे कुटुंबातील विश्वस्त न ठेवल्यामुळे ग्रामस्थांसह पंचक्रोषीत नाराजीचा सूर ऐकू येत आहे. त्यातच नवनियुक्त मुख्याध्यापक विलास शेळके यांच्याकडे पदभार आहे.पण अद्याप त्यांना नियुक्ती पत्र नाही. त्यांनी दोन वर्षापासून पुण्यस्मरण कार्यक्रम बंद केला.
कुणी फोन केला तर फोनच न उचलणे, अरेरावीने बोलणे यास कंटाळून आज विनानियोजन आमदार काळेंचे कार्यकर्ते संचालक दिलीप बोरनरे यांचे अध्यक्षतेखाली बाळासाहेब बारहाते, गणेश दाणे, विजय कदम, बाबासाहेब शिंदे, एकनाथ शिंदे, अशोक उकीर्डे, अप्पासाहेब निकम, नानासाहेब निकम, बबनराव गाढे, शतुघ्न कराळे आदींसह ग्रामस्थांनी माईंचे २५वे पुण्यस्मरण भर दुपारी बारा वाजता उन्हात साजरे केले. इथून पुढे पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा केला नाही तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा दिलीप बोरनरे यांनी शिक्षकांना दिला.
पुण्यस्मरण साजरे करण्यास उदासिनता का? ऐपत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही साजरे करू, असा सवाल अप्पासाहेब निकम यांनी उपस्थितांना केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक बी.पी.नेहे, सूत्रसंचालन ए.के.राजगुरु, शेवटी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून मुख्याध्यापक विलास शेळके यांनी आभार मानले.
गुराख्याने शिक्षकांना शिकविला संस्काराचा धडा
उक्कडगाव येथील जनावरे वळणारे गुराखी शत्रुघ्न कराळे यांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगून काळे कुटुंबाचे योगदान अधोरेखित केले. या कुटुंबाच्या जिवावर शिक्षकांनी आतापर्यत लाखो, करोडो रुपये कमावले. त्यांना काळे कुटुंबाचा विसर पडत असेल तर शे पाचशे रुपये खर्च करू शकत नसाल तर आपण या भावी पिढीला काय संस्कार देणार किंवा तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा, असा सवाल कराळेंनी उपस्थित करून शिक्षकांचे चांगलेच कान टोचले.