श्रीगोंदा – घोड आणि कुकडीच्या कालव्याची आवर्तने १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय आज (दि.२४) पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, धरणातील उपयुक्त पाणीसाठा व उन्हाळी पिकांचा विचार करता कुकडीचे एक तर घोडची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत.
या बैठकीत आ. रोहित पवार आणि आ. बबनराव पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन ४२ दिवसांचे करण्याची तर आ. अतुल बेनके यांनी आवर्तन ३६ दिवसांचे करण्याची मागणी केली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आवर्तन किती दिवसाचे सोडायचे याबाबत सखोल माहिती घेऊन निर्णय घेऊ. अखेर ३८ दिवसांचे आवर्तन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती समजली. बैठकीत घोडची दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे. पहिले आवर्तन १ मार्चपासून तर दुसरे आवर्तन १ मे पासून सोडण्याचे नियोजन आहे. आवर्तनातून घोडनदीवरील बंधारे भरण्याचा निर्णय झाला आहे.
या बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे, आ. अतुल बेनके, आ. निलेश लंके, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते, मिलिंद दरेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.