राहुरी – राहुरीत व विविध केंद्रस्तरावर सुरू असलेले नवभारत साक्षरता सर्वेक्षण हे प्रशिक्षण शिबिर शिक्षकांनी बंद पाडले. विविध शिक्षक संघटना या बहिष्कारात सहभागी झाल्या होत्या. राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेले नवभारत साक्षरता सर्वेक्षण या शालाबाह्य कामावर सर्व संघटनांतर्फे बहिष्कार घालण्यात आला. चालू असलेले प्रशिक्षण कार्यक्रम बंद पाडण्यात आले.
शिक्षण विभाग मुख्याध्यापकांना फोन करून हे सर्वेक्षण करण्यास भाग पाडत होते. परंतु हे सर्वेक्षण २०२३पासून ते २०२७पर्यंत चालणार आहे. ही कामे करताना शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे, तसेच शिक्षक भरती गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्याने अगोदरच विद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांवर कामाचा ताण आहे. त्यातच या अशैक्षणिक कामाचा खूप ताण होणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबतचे निवेदन सर्व शिक्षक संघटनांनी गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांना आज दिले. तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, तसेच जुनी पेन्शन समन्वय समितीचे अध्यक्ष राज जाधव, आण्णासाहेब खाडे, किशोर शिंदे, मुख्याध्यापक ल्युकस संसारे, प्राचार्य शुभांगी उंडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, अरुण तुपविहीरे आदी शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी याबाबतचे निवेदन गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले.