सासवड – मागील शासनाच्या काळात व पुरंदरच्या मागील लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेचा कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करावी, अशी मागणी वारंवार करुनही माजी राज्यमंत्र्यांनी पत्रकाद्वारे या चौकशीबाबत स्थगितीच्या केलेल्या मागणीमुळे या कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. त्यामुळे याविरुद्ध विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, युवक काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप, संभाजी काळाणे, तालुका युवकचे प्रभारी चेतन भैय्या महाजन उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनीही याला दुजोरा दिला होता.
पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील साखळी बंधार्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली. काही ठिकाणी शेताचे बांध बंधारे म्हणून दाखवले गेले आहेत. मयतांच्या नावावर करारनामे करण्यात आली आहेत. तर दोन गुंठे जागा असलेल्या ठिकाणी दोन किलोमीटरच्या चार्या दाखविल्या गेल्या आहेत. मागील तीन वर्षे चांगला पाऊस झाल्याने पाणी आडवण्याची आवश्यकता भासली नाही, परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे;
मात्र जलयुक्त शिवारमधील बोगस कामे कागदोपत्री दाखवल्याने नवीन कामे करण्यासाठी साइट शिल्लक नाही आणि प्रत्यक्षात कामही झाली नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन भ्रष्टाचार करणार्यांना शासन झाले पाहिजे, अशी मागणी अधिवेशनात करून याबाबत लक्षवेधी लावणार असल्याचे आमदार जगताप म्हणाले. भ्रष्ट राजकीय मंडळी आणि निष्क्रिय ठेकेदारांमुळे हा मानवनिर्मित दुष्काळ असल्याचेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.