कोपरगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या चार तत्त्वांवर आधारित जगात आदर्श असे भारतीय संविधान लिहिले. त्यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला असून, संविधान बदलण्याबाबतच्या अपप्रचाराला जनतेने बळी पडू नये. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेंपासून कोल्हे परिवाराचे ना. रामदास आठवले यांच्याशी ऋणानुबंध असून, यापुढील काळातही हे ऋणानुबंध कायम राहतील, अशी ग्वाही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर माता रमाई जयंतीनिमित्त रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान सोहळ्याचे व सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हे बोलत होत्या.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची प्रशंसा केली. आठवले यांनी त्यांच्या लग्नाची आठवण सांगताना ‘माझ्या लग्नाच्या वेळी अनेकांनी लाडू खाल्ले, कारण लाडू देणारे होते शंकरराव कोल्हे’, अशी कविता यावेळी सादर केली. स्व. कोल्हे यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते. समाजकारण व राजकारण करताना स्व. कोल्हेसाहेबांनी कायम सर्वसामान्य माणसांच्या विकासाचा विचार करून त्यांना न्याय मिळवून दिला.
आयुष्यभर ते दीनदलित व तळागाळातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवत उल्लेखनीय काम करत असून, जनतेने कोल्हे परिवाराला कायम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य सचिव दीपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुनील मोकळ, राजाभाऊ गायकवाड, सोमनाथ लोहकरे, रामदास कोपरे, किशोर मैंद, आकाश डोखे, मंगेश मोरे, राहुल सोनवणे यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडूबाई खरात यांनी खास स्नेहलता कोल्हे यांच्या फर्माइशवरू ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र…’ हे गीत सादर करून वातावरण भीममय करून टाकले होते.