पाथर्डी – मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मुंबइच्या दिशेने कुच केली आहे. लाखो मराठाबांधवांसह निघालेले भगवे वादळ आज सकाळी पाथर्डीच्या सीमेवर धडकणार आहे. मिडसांगवी ते नगरपर्यंत सुमारे ८५ किलोमीटरचा पदयात्रा रस्त्याची पाहणी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व त्यांच्या पथकाने पाहणी करून आयोजकांना सूचना केल्या आहेत.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आदी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने जात असून, २१ जानेवारी रोजी ही पदयात्रा पाथर्डी तालुक्यातून येणार आहे. यादिवशी सकाळी आठ वाजता पदयात्रा तालुक्यातील मिडसांगवी गावात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी सुमारे चार टन पोह्याचा नाष्टा, पाणी व इतर अल्पोपहाराची व्यवस्था या परिसरातील गावच्या नागरिकांनी केली आहे.
पदयात्रेतील लोकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था फुंदे टाकळी फाटा तर याच पुढे चार किलोमीटर अंतरावर दुसरी ठिकाणी जेवण व्यवस्था वाळुंज, आगसखांड शिवारात केली गेली आहे. तीन ठिकाणी मिळून सुमारे शंभर एकरच्या परिसरावर जेवणाचे स्टॉल, पाणी, वाहन पार्किंग अशी व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. गावागावातील लोकांनी जेवणाची व्यवस्था करून त्यासाठी लागणारे पाण्याचे टँकर, पत्रावळी, ग्लास ही सुद्धा सामग्री घेऊन येण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या समन्वयकाकडे दिली आहे.
वाळुंज, आगखांड शिवारातील जेवणाच्या ठिकाणी सुमारे दोन टन पिठले-भाकर जेवणासाठी केले जाणार आहे. या जागेवर दोन्ही बाजूने जेवणाचे स्टॉल लावले जाणार आहेत. त्या ठिकाणी पदयात्रेतील लोक स्टॉलवर जाऊन स्वतः जेवण घेणार अशी व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडून केली असून एक छोटासा स्टेज व लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. या माध्यमातून आलेला लोकांना सूचना तर जरांगे पाटील हे उपस्थितांना या ठिकाणाहून वेळप्रसंगी संबोधित करू शकतात. टेम्पोच्या केळी, खिचडी, मसाले भात, लापशी,चपाती, भाकरी, सुकी भाजी, चटणी व ठेचा अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था पदयात्रेतील लोकांसाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी केली आहे. जेवणाचे पाकीटही स्टॉलवर ठेवले गेले आहे. शुद्ध बॉटल पिण्याचे पाण्याचे हजारो बॉक्स देण्यात येत आहे.
पाथर्डी, शेवगाव त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार,आष्टी येथीलही नागरिकांनी या पदयात्रेसाठी आपला सहयोग दिला. सुमारे दहा हजाराच्या आसपास तरुण स्वयंसेवक या ठिकाणी आपली सेवा देणार आहे. पदयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, फ्लेक्स बोर्ड, रस्त्याच्या दोन्ही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आले आहे. फुंदे टाकळी फाटा व पाथर्डी शहरात नाईक चौकात आयोजकांकडून मनोज जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. जेसीबीतून फुलांद्वारे पदयात्रेचे स्वागत केले जाणार आहे.मिडसांगवी ते नगरपर्यंत सुमारे ८५ किलोमीटरचा पदयात्रा रस्त्याची पाहणी जिल्हा पोलीस प्रमुख ओला व त्यांच्या पथकाने पाहणी करून आयोजकांना सूचना केल्या आहेत.पाथर्डीतील सुमारे चाळीस मराठा आंदोलक समन्वयकांना मराठा आरक्षण पदयात्रेच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना लेखी स्वरुपात केले आहेत.
महामार्गावरील वाहतूक वळविली
नगरहून पाथर्डीमार्गे मराठवाड्याला जाणारी कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक वळविण्यात आली आहे. तर याच महामार्गावरील पाडळसिंगीवरून नगरकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या रस्त्यावर असणारी अंतर्गत वाहतूकही स्थानिक पोलिसांनी वळवली आहे.
तीनशेच्यावरपोलीस अधिकारी व कर्मचारी
जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक २, पोलीस निरीक्षक १०, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक ३० असे अधिकारी असून पोलीस कर्मचारी २५०, एसआरपी पोलीस एक कंपनी ( ८० कर्मचारी), आरसीपी पोलीस दोन प्लाटून ,(३० कर्मचारी) असा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. ज्या मार्गावरून ही पदयात्रा जाणार आहे, त्या रस्त्याला मिळणारे छोटे-मोठे रस्ते त्या ठिकाणीही पोलिसांचे पूर्ण नियंत्रण असणार असून त्या ठिकाणी बॅरिकेटचा वापर करण्यात आला आहे.