जामखेड (प्रतिनिधी) :- शहरात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी (दि. 29) संध्याकाळी पाचच्या सुमारास झालेल्या धुवाधार पावसाने शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे, जूनपासून सुरू झालेल्या पावसाच्या हंगामात एक दिवसात पहिल्यांदाच धुवाधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरात कोणतेही नुकसान झाले नसले, तरी विंचरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन चार महिने होत आले पण तालुक्यात अद्याप नदी नाले पाझर तलाव, कोल्हापूर बंधारे व मध्यम प्रकल्प अद्याप कोरडेठाक आहेत. गेल्या पाच दिवसांपुर्वीच सौताडा (बीड जिल्हा) घाटाच्या पायथ्याशी भुतवडा तलाव आहे. मुगगाव, सौताडा या परीसरातील पाच तलाव भरल्या नंतर भुतवडा तलावात पाणी येते. या परिसरात चांगला पाऊस असल्याने भुतवडा तलाव 65 टक्के भरला होता. परंतु शनिवारी सायंकाळी घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडल्याने तेथील तलाव भरल्यानंतर भुतवडा तलावात पाणी आले व रविवार सकाळी साडेआठ वाजता भुतवडा तलाव व जोडतलाव ओव्हर फ्लो झाले.
भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा असून जोडतलाव ५६ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते. दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ व जामखेड पासून सात कि. मी. अंतरावर असलेला रामेश्वरचा धबधबा असून यावर असलेला सौताडा तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. ह्याच धबधब्यातून येणारे पाणी भुतवडा तलावात येते.
दरम्यान,आज (दि. 29) सायंकाळी 5 च्या सुमारास मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. शहरात मागील दोन दिवस रिमझिम पाऊस झाला. बुधवारी रात्रीही पावसाची रिमझिम सुरू होती. गुरुवारी सकाळी काही वेळासाठी हा पाऊस उघडला. परंतु दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली.संततधार स्वरूपात बरसणाऱ्या पावसाचा जोर अधूनमधून वाढत होता.
दरम्यान, दुपारी आणि सायंकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला.अनेक भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरम्यान या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती. बहुतेक लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्यामुळे बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातून परतणारी मुले, त्यांना आणण्यासाठी गेलेले पालक तसेच इतर कामांच्या ठिकाणी परतणाऱ्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली.