शिर्डी – ज्या देशात संसदीय कामकाज चालत नाही, विचारांचे आदानप्रदान होत नाही, विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, हेच सरकार समजूनच घेत नाही. देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कधीच तयारी ठेवत नाही तेव्हा अशा प्रकारची संसदीय लोकशाही काय कामाची, असा सवाल माजी केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने “संविधान के राह पर’ या विषयाला धरून राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्याहस्ते झाले.
कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आमदार लहू कानडे, विजय खडसे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश लहाडे, अश्विनी खोब्रागडे, पवन डोंगरे, प्रियंका बिडकर, राहुल साळवे, विनय बोधे, गौतम गवई, राहुल वंजारी, प्रियंका रणपिसे, राजेंद्र वाघमारे, बंटी यादव, प्रविण सुरवडे, कृष्णा भंडारे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते. आंबेडकर हे केवळ बसपा किंवा इतर रिपब्लिकन पक्षाचे नसून कॉंग्रेसचे ही आहेत, हे दाखवायचे असेल तर आता कॉंग्रेसनेही निळा झेंडा स्वीकारून जयभीमचा नारा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष लिलोठीया यांनी केली.