राज्य ग्रामसेवक युनियनच्या त्रैमासिक सभेत मागणी
ग्रामसेवकांना 15 दिवसांची सुटी मिळण्याबाबत ठराव
नगर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात करोनाचा प्रसार रोखतानाच व्यापक जनजागृती करण्यासाठी ग्रामसेवक अविरत काम करीत आहेत. या कालावधीत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. तर 7 ग्रामसेवक करोनामुळे मयत झाले आहेत. ग्रामसेवकांना राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. यात केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी उचलून केंद्राकडूनही 50 लाखांचे विमा कवच उभारावे, असा ठराव युनियनच्या त्रैमासिक सभेत करण्यात आल्याची माहिती, युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची त्रैमासिक सभा झूम ऍपव्दारे ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आली. या मिटिंगमध्ये राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे नगरमधून सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजीव निकम, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, बुलढाणा येथील चव्हाण, जालना येथील समाधान वाघ, शेळके, अशोक काळे, राजेंद्र पावसे, अशोक नरसाळे, सुनिल नागरे, मंगेश पुंड, बाळासाहेब आमरे आदी उपस्थित होते.
राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हा युनियनचे जिल्हाध्यक्ष, सचिव यांनी या ऑनलाइन मिटिंगमध्ये सहभाग नोंदवला. ग्रामसेवक मार्चपासून अक्षरश: चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत.त्यांना किमान 15 दिवसांची सुटी देण्यात यावी. तसेच ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने आश्वासने न देता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी पुढील काळात व्यापक आंदोलन उभारुन संघर्ष करण्याचा एकमुखी निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केला आहे.