श्रीगोंदा – शेतात जाण्यासाठी शेजाऱ्यांकडून त्रास होत असल्याने तसेच एक जण काही वर्षांपूर्वी घेतलेल्या पैशांसाठी वारंवार दम देत असल्याने नैराश्यातून हौशीराम राधू लाटे (वय – ६४, रा. कोथुळ) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मनोहर हौशीराम लाटे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब सदाशिव लाटे, यमुना बाबासाहेब लाटे, कुंडलिक बाबासाहेब लाटे, राजेंद्र बाबासाहेब लाटे, शिवाजी रघुनाथ भोसले (सर्व रा. कोथुळ) यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मयत हौशीराम लाटे यांची कोथुळ शिवारात शेती असून त्यांचे शेजारी बाबासाहेब लाटे यांच्याशी बांधाच्या कारणावरून वारंवार वाद होत होते. त्यामुळे आम्ही शेतीच्या मोजणीसाठी विचारले असता “मी मोजणीचे पैसे भरणार नाही आणि जमीन देखील मोजून देणार नाही” असे आरोपीने सांगितले होते. काल (दि.३०) दुपारी आरोपी लाटे कुटुंबाने फिर्यादी लाटे कुटुंबाला शेतात शिवीगाळ करीत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. मी आत्महत्या केली तरच माझ्या जमिनीचा बांध सरळ करून मिळेल, असे मयत म्हणाले होते.
त्याचबरोबर मयत हौशीराम लाटे यांनी शिवाजी भोसले यांच्याकडून १९९७ साली १० हजार रुपये घेतले होते. “मला व्याजासह पाच लाख रुपये दे” अशी मागणी भोसले वारंवार करीत होता. मयत लाटे यांनी सगळे पैसे दिले असल्याचे सांगूनही तो वारंवार दम देत होता. बुधवारी (दि.३१) सकाळी हौशीराम लाटे यांनी घराजवळील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.