अकोले – अकोल्यातील महामेळाव्यात बचतगटांना 1 कोटी 56 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जास मंजूरी देण्यात आली. स्टेट बॅंक महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपरे होत्या. बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास स्टेट बॅंकेचे उपमहाव्यवस्थापक रवी कुमार वर्मा यांनी व्यक्त केला.
महिलांमधील आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उमेद नवनवीन योजना राबवित आहे. यात बचतगटांना सर्वांगीण विकासाबाबत स्टेट बॅंक महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, असे वर्मा म्हणाले.
स्टेट बॅंकेच्या अकोले शाखेने येथील पंकज लॉन्स व मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर, वाहन व गृहकर्ज मेळावा आणि जिल्हास्तरीय महिला बचतगट महामेळाव्याचे आयोजन केले होते. या बचतगट महामेळाव्यास जिल्ह्यातून अहमदनगर, राहुरी, कोपरगाव, नेवासे, अकोले व अकोल्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागातून 130 महिला बचतगटातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
या महामेळाव्यास बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, स्टेट बॅंकचे नेटवर्क दोन मुंबईचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, स्टेट बॅंक औरंगाबादचे उपमहाव्यवस्थापक रवीकुमार वर्मा, नगरचे सहाय्यक महाव्यवस्थापक विनोद कुमार, अकोले शाखेचे व्यवस्थापक नितीन वानखेडे, बायफ संस्थेचे विभागीय व्यवस्थापक जितिन साठे उपस्थित होते.
राहीबाई पोपेरे म्हणाल्या,आपण व कुटुंबातील लोक आजारी पडू नयेत, म्हणून प्रत्येक महिलेने शेतात व नसेल तर परसदारी गावरान पारंपारिक बियाणे वापरून रोज लागणारा भाजीपाला तयार करावा. कारण विषमुक्त आहार हाच आपल्या आरोग्याचा खरा मूलमंत्र आहे. बॅंकेकडून कर्ज उचलून ते परत फेडले तरच आपली आर्थिक पत वाढेल व महिलांना कुटुंबात योग्य सन्मान व आर्थिक स्वावलंबन मिळेल.
यावेळी वेळेवर परतफेड करण्यात आघाडीवरील बचतगटातील महिलांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर किरण कुटे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी अकोल्याचे व्यवस्थापक नितीन वानखेडे, कार्तिक धामणे, रामदास शहाणे, वैभव कदम, कुणाल नेरकर, विवेक कुलकर्णी, शैलेश बकले, योगेश जोशी, धनाजी भागवत, किरण तळपे, जनार्दन बोंतले आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक राहुरी येथील शाखा व्यवस्थापक जनार्दन बोंतले यांनी केले. सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. व्यवस्थापक नितीन वानखेडे यांनी आभार मानले.