गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे
पारनेर – तालुक्यातील जवळा येथे इयत्ता दहावीत शिकत असलेल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, या घटनेचा योग्य तपास लावा, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून सतत गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने पारनेर तहसीलदार व पोलीस ठाण्यास देण्यात आले.
तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. वारंवार तालुक्यामध्ये गुन्हेगारी घटना घडत असताना पोलीस प्रशासन गप्प का आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, उल्हासनगर व मुंबई येथील साकीनाका येथे महिलांवर अत्याचारच्या घटना घडल्या म्हणजेच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था हे व्यवस्थित नसून आघाडी सरकारे फक्त खंडणी गोळा करण्याचे काम करीत आहे.
महाराष्ट्रात महिला व मुली या असुरक्षित असून भाजप या सरकारचा निषेध करीत आहे. आरोपींना जबर वचक बसविण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई थोरात, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, महिला तालुकाध्यक्षा उषा जाधव, सोशल मीडिया प्रमुख ऐश्वर्या रेपाळे, शहराध्यक्षा अनुराधा पवळे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे, शहराध्यक्ष किरण कोकाटे, युवती सायली रेपाळे, तालुका सरचिटणीस सागर मैड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, संभाजी आमले, पोपट लोंढे, दीपक, भागवत, कुशारी भांड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.