पाथर्डी – केंद्र सरकारने प्रधानमंत्री एक रुपयात पीकविमा ही महत्त्वाकांशी योजना चालू केली आहे. रब्बी हंगामामधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा. यंदाची दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाचा पीकविमा उतरवल्यास भविष्यातील होणारे नुकसान टाळता येईल. त्यासाठी चांगल्या शासकीय योजनेत सहभागी होऊन पीकविम्याची नोंदणी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले.
तालुक्यात पीकविमा योजनेच्या जनजागृती प्रचार रथाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार श्याम वाडकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडल कृषी अधिकारी वैभव थोरे, कृषी पर्यवेक्षक सुनील देखणे, पीकविमा प्रतिनिधी अमोल वाघमारे, शेतकरी प्रतिनिधी आश्रू टकले, आदिनाथ बडे आदी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी शिंदे म्हणाले की, तालुक्याच्या दृष्टीने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू व कांदा या पिकांचा पीकविमा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ एक रुपयांमध्ये उतरवला जात असून, शेतकऱ्यांना संकटात मदत व्हावी या हेतूने सरकारने महत्त्वकांक्षी योजना राबवली आहे. याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. त्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४साठीची नोंदणी राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवरून सुरू आहे. शेतकरी बांधव पीकविम्यात सहभाग नोंदू शकतात. प्रधानमंत्री पीकविमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली, तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका असल्याने सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.