लाहोर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे आता इम्रान खान यांचे सरकार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे अविश्वास ठराव येण्याच्या काही तास आधी इम्रान खान यांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात भारताचे आणि भारतीयांचे कौतुक केले आहे.
इम्रान खान यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारताचे तोंडभरून कौतुक केले आहे. “मला आज दु:ख देखील होतंय आणि वाईट देखील वाटतंय. आपल्यासोबतच भारत स्वतंत्र झाला. मी इतरांपेक्षा भारताला चांगलं ओळखतो. माझे अनेक मित्र देखील आहेत. क्रिकेटमुळे मला लोकांकडून फार प्रेम मिळालं. मला वाईट वाटतंय की आरएसएसच्या विचारसरणीमुळे आपले चांगले संबंध नाही. पण मला एक सांगावंसं वाटतं की ते फार स्वाभिमानी लोक आहेत”, असे इम्रान खान म्हणाले.
#WATCH | Indians are ‘khuddar quam’ (very self respecting people). No superpower can dictate terms to India. I’m disappointed that only due to RSS ideology and what is done with Kashmir we don’t have a good relation: Pakistan PM Imran Khan pic.twitter.com/EAR3bPSqGs
— ANI (@ANI) April 8, 2022
“कधी कुणाची हिंमत होणार नाही की त्यांच्यावर दबाव टाकतील. कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही की त्यांच्यावर दबाव टाकेल. ते असं सांगू शकत नाही की भारतानं परराष्ट्र धोरणात आम्ही जे म्हणतो, तेच बोलावं. आता तुम्ही पाहात आहात की रशियावर सध्या निर्बंध लागले आहेत. पण भारतीय म्हणतायत की आम्ही तेल आयात करू. माझं देखील हेच म्हणणं आहे. मी म्हणतो की आमचा कुणाशीही वाद नाही. मी कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मी म्हणतो की माझ्या २२ कोटी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यायचंय. त्यानंतर मी जगभरातल्या गोष्टी ऐकायला तयार आहे”, असं इम्रान खान यावेळी म्हणाले.
दरम्यान, अविश्वास ठराव आपण जिंकणार नसल्याची खात्री पटल्यानंतर इम्रान खान यांनी देशवासीयांना नवीन सरकार येईल तेव्हा देशभर शांततेत मोर्चे काढण्याचे आवाहन केले आहे.